उच्च न्यायालयाकडून 'मना'चे श्लोक' या सिनेमाच्या रिलीजला स्थगिती देण्यास नकार देण्यात आला आहे. सिनेमाच्या टीमनं याबाबत जाहीर प्रसिद्धीपत्रक शेअर करत ही माहिती दिली आहे. त्यात लिहिलंय, "माननीय उच्च न्यायालयाने 'मना' चे श्लोक या चित्रपटाच्या प्रदर्शन थांबवण्यासाठीच्या केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान, चित्रपट प्रदशिंत करण्यासाठी स्थगिती आदेश देण्यास नकार दिला. त्यामुळे चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. आम्ही 'मना'चे श्लोक' चित्रपटाच्या संपूर्ण टीमकडून माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो."
advertisement
हे सर्व पूर्वनियोजित असल्याची शंका - टीम
"गेल्या पाच महिन्यांपासून आम्ही या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मेहनत करत आहोत. मना चे श्लोक या नावाचा चित्रपट येत असल्याचे सर्वांनाच खूप आधीपासून माहीत होते. मात्र, प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी सिनेमाचे प्रदर्शन थांबवण्याचा अडथळा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रदर्शनाच्या दोन दिवस आधीपासून सोशल मीडियावर नावाबाबत विरोधाचे मेसेजेस फिरू लागले. या सगळ्या गोष्टींमुळे संपूर्ण टीमला अनावश्यक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. घटनांचा क्रम बघता हे सर्व पूर्वनियोजित असल्याची शंका येते आणि हे दुर्दैवी आहे."
'मना'चे श्लोक' नावाचा नेमका अर्थ काय?
चित्रपटामध्ये रामदास स्वामींचा किंवा त्यांच्या कुठल्याही श्लोकाचा उल्लेख सुद्धा नाही. 'मना चे श्लोक हे शीर्षक - चित्रपटातील नायक व नायिका म्हणजेच मनवा आणि श्लोक यांनी त्यांच्या मनांबरोबर सुरू केलेल्या प्रवासाशी संबंधित आहे. आम्ही सर्वजण रामदास स्वामींच्या सर्व रचनांचा सन्मान करतो आणि त्यांचा अवमान करण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही.
नावाशी आम्ही प्रामाणिक
आम्ही या नावाशी प्रामाणिक आहोत. आत्ता संपूर्ण मराठी सिनेसृष्टी स्वतःच्या पायांवर भक्कमपणे उभे राहण्याचा प्रयत्न करत असताना, अशा कौटुंबिक सिनेमाचं स्वागत करण्याऐवजी कुठलीही माहिती न घेता, सर्वांना विरोध करण्यास प्रवृत्त करण्यात आले हे निराशा जनक आहे. अखेर माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे. आम्ही प्रेक्षकांना विनंती करतो की, जसे तुम्ही याआधी आम्हाला प्रेम दिले, तसेच यावेळीही चित्रपटाला भरभरून प्रेम द्यावे. आणि मनामध्ये कुठलेही किंतु परंतु न आणता या सिनेमाला आशीर्वाद आणि भरघोस प्रतिसाद द्यावा.