जेलने बदललं आयुष्य!
बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील बेलसंड गावात पंकज त्रिपाठी यांचा जन्म झाला. लहानपणी त्यांना अभिनयाची फारशी आवड नव्हती, पण एकदा ‘अंधा कुआँ’ हे नाटक पाहताना एका कलाकाराने त्यांना रडवलं आणि त्यांच्या आतमध्ये काहीतरी जागृत झालं. तेव्हापासून त्यांच्या पटनामध्ये थिएटरच्या प्रवासाची सुरुवात झाली.
कॉलेजमध्ये ते विद्यार्थी राजकारणातही सक्रिय होते. एका आंदोलनादरम्यान त्यांना सात दिवस जेलमध्ये जावं लागलं. जेलमधील त्या एकांतवासात त्यांना स्वतःला आणि त्यांच्या आत लपलेल्या अभिनेत्याला ओळखता आलं. त्याच वेळी त्यांना हिंदी साहित्याचीही आवड निर्माण झाली.
advertisement
दिवसा अभिनय, रात्री स्वयंपाक!
एक थिएटर कलाकार बनण्यासाठी पंकज त्रिपाठींनी खूप संघर्ष केला. ते दिवसा थिएटरचा रियाज करायचे आणि रात्री पटनातील एका हॉटेलच्या स्वयंपाकघरात काम करायचे. ही दुहेरी भूमिका ते दोन वर्ष जगले. त्यानंतर त्यांना कळलं की, ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ मध्ये प्रवेश घेण्यासाठी ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. त्यांनी लगेच हिंदी साहित्यात ग्रॅजुएशनला सुरुवात केली. तीन वेळा प्रयत्न केल्यानंतर त्यांना ‘एनएसडी’मध्ये प्रवेश मिळाला.
पंकज त्रिपाठींनी चोरल्या होत्या मनोज वाजपेयी यांच्या चपला
मनोज बाजपेयी आणि पंकज त्रिपाठी यांच्यात एक अविस्मरणीय किस्सा आहे. जेव्हा मनोज बाजपेयी 'गँग्स ऑफ वासेपूर' चित्रपटाचं शूटिंग करत होते, तेव्हा ते पटनाच्या मौर्या हॉटेलमध्ये थांबले होते. याच हॉटेलमध्ये त्यावेळी पंकज त्रिपाठी किचन सुपरवायझर म्हणून काम करत होते. 'द कपिल शर्मा शो'मध्ये पंकज त्रिपाठींनी हा किस्सा सांगितला.
पंकज यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की मनोज बाजपेयी हॉटेलमध्ये आले आहेत. हे ऐकून पंकज खूप उत्सुक झाले, कारण ते स्वतः त्यावेळी थिएटर करत होते आणि मनोज बाजपेयींना आपला आदर्श मानत होते. त्यांनी मनोज बाजपेयींची चांगली खातिरदारी केली.
जेव्हा मनोज बाजपेयी हॉटेलमधून चेक-आउट करून गेले, तेव्हा ते त्यांच्या चपला रूममध्येच विसरले. हे पाहून एक सफाई कर्मचारी त्या चपला स्टोअररूममध्ये नेऊन ठेवत होता. पण, पंकज त्रिपाठींना हे कळताच त्यांनी त्या चपला त्या सफाई कर्मचाऱ्याकडून घेतल्या. कारण, पंकजला वाटलं की 'मी एकलव्यासारखं त्या चपलांमध्ये पाय घालून पाहीन.' हे सांगताना पंकज खूप भावुक झाले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.
10 वर्षांच्या संघर्षानंतर मिळाला पहिला राष्ट्रीय पुरस्कार!
२००४ मध्ये ते ४६ हजार रुपये घेऊन मुंबईला आले, पण २५ डिसेंबरपर्यंत त्यांच्या खिशात फक्त १० रुपये उरले होते. तो दिवस त्यांच्या पत्नीचा वाढदिवस होता, पण ते तिच्यासाठी केक किंवा गिफ्ट घेऊ शकले नाहीत. सुरुवातीची १० वर्ष त्यांनी छोट्या भूमिका करून काढली. अखेर २०१२ मध्ये ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटातून त्यांना खरी ओळख मिळाली. त्यानंतर ‘फुकरे’, ‘निल बट्टे सन्नाटा’ आणि ‘बरेली की बर्फी’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. ‘न्यूटन’ या चित्रपटासाठी त्यांना 2017 साली ‘नॅशनल फिल्म अवॉर्ड’ मिळाला.