कोल्हापूर : हिंदू संस्कृतीत कोणताही सण साजरा करताना त्या सणा दिवशी विशेष अन्नपदार्थ बनवले जातात. अशाच पद्धतीने संक्रांत सणाआधी येणाऱ्या भोगीच्या दिवशीही विशेष भोगीची भाजी बनवली जाते. त्याचबरोबर यासोबत तीळ लावलेल्या भाकरी बनवल्या जातात मात्र हे पदार्थ याच दिवशी का खाल्ले जावेत यामागे हे प्रमुख कारणे आहेत. त्याबद्दल कोल्हापूरच्या आहारतज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
advertisement
खरंतर मकर संक्रांत हा हिंदू सणांमधील सर्वात महत्त्वाचा सण आहे. या सणाच्या आदल्या दिवशी भोगी सण साजरा केला जातो. आनंद घेणारा किंवा आनंद उपभोगणारा असाच या भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ होतो. तर या दिवशी भोगीची मिश्र भाजी आणि तीळ मिश्रीत बाजरीच्या भाकरीचा आनंद घेतला जातो. 'न खाई भोगी तो सदा रोगी' अशी म्हण ही भोगीच्या जेवणाबद्दल प्रसिद्ध आहे. यामागे कारणही तसेच आहे. या हिवाळ्याच्या दिवसात येणाऱ्या सर्व प्रकारच्या भाज्या या भोगीच्या मिक्स भाजीमध्ये वापरल्या जातात. त्यामुळेच ही भाजी सर्व प्रकारच्या घटकांनी युक्त असते, अशी माहिती कोल्हापूरच्या आहारतज्ज्ञ अमृता सूर्यवंशी यांनी दिली आहे.
मकर संक्रांतीसाठी घरीच तयार करा पाकातील तिळाचे लाडू; पाहा सोपी रेसिपी
अमृता सूर्यवंशी सांगतात की, थंडीच्या दिवसात इतर दिवसांच्या तुलनेत आपली पचन संस्था ही जास्त चांगल्या पद्धतीने कार्य करते. पण याच थंडीच्या दिवसात आपली रोगप्रतिकार क्षमता कमी झालेली असते म्हणूनच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी एक एकत्र घटकांची भाजी उपयोगी पडते. यामध्ये फायबर, कार्बोहाइड्रेट्स, प्रोटीन, विविध जीवनसत्वे, पोटॅशियम अशा बऱ्याच प्रकारच्या सत्त्वांबरोबरच अँटीऑक्साडंट गुणधर्म असतात. त्यामुळेच भोगीच्या दिवशी बनवलेली स्पेशल मिक्स भाजी आणि तीळ लावलेल्या भाकरी या काळात आवर्जून खाणे गरजेचे आहे.
संक्रांती दिवशी का खावेत तिळगुळ
ज्या वेळेला शरीरात रोगप्रतिकारक शक्ती कमी असते तेव्हा आजारपण बळावते त्यामुळेच संक्रांतीच्या दिवशी ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळे पदार्थ खाल्ले आणि वाटले देखील जातात. त्यामध्ये तिळगुळ, शेंगदाण्याची वडी/लाडू तिळाची वडी/लाडू खाल्ले जातात. थंडीच्या दिवसात आपली त्वचा कोरडी पडू नये म्हणून आपण काळजी घेत असतो. पण त्याच पद्धतीने शरीराच्या अंतर्गत भागात देखील तेलकटपणा राखण्यासाठी या सर्व पदार्थांचा फायदा होतो.
या सर्व कारणांमुळेच हिंदू संस्कृतीत त्या त्या सणाच्या निमित्ताने आणि परंपरेनुसार सांगितल्याप्रमाणे पदार्थ बनवून खाणे, हे कधीही शरीरासाठी कधीही फायदेशीरच ठरत असते, असे आहारतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.