जालना: अनेक तरुण आपल्या कल्पकतेने आणि बुद्धी चातुर्याने वेगवेगळे प्रयोग करत असतात. असाच एक प्रयोग जालना जिल्ह्यातील दूधपुरी गावच्या राजेंद्र पाचफुले या तरुणाने केला. मागील काही वर्षात रस्ते अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे. हीच बाब लक्षात घेऊन त्याने अपघात अलर्ट सिस्टीम तयार केली आहे. या यंत्राच्या साह्याने अपघात झाल्यानंतर ताबडतोब लाईव्ह लोकेशन आणि एसएमएस नातेवाईक, पोलीस यंत्रणा आणि ॲम्बुलन्स यंत्रणेला पाठवण्यात येतो.
advertisement
अपघातग्रस्तांना मिळणार तातडीची मदत
राजेंद्र पाचफुले हा युवक दूधपुरी या छोट्याशा गावातला रहिवासी आहे. त्याने पॉलिटेक्निकचे शिक्षण घेतले आहे. आर्थिक अडचणीमुळे पुढील शिक्षण तो घेऊ शकला नाही. मात्र पॉलीटेक्निकच्या शिक्षणातून मिळालेल्या ज्ञानातून त्याने एका इंजिनियर मित्राच्या साह्याने एक्सीडेंट अलर्ट सिस्टीमची निर्मिती केली. या यंत्राद्वारे अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळणे शक्य होणार असल्याचा दावा राजेंद्र पाचफुले करतात.
Road Safety अपघातानंतरचा 'गोल्डन अवर' म्हणजे काय? या काळात नेमकी काय काळजी घ्यावी? Video
पेटंटसाठी प्रयत्न
पाचफुले हे या यंत्राला अधिक अपग्रेड करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सध्या त्यांनी या यंत्राच्या पेटंटची प्रक्रिया सुरू केली असून ती अंतिम टप्प्यात आहे. एक्सीडेंट अलर्ट सिस्टम तयार करण्यासाठी त्यांना 20 ते 25 हजारांचा खर्च आला. त्याचबरोबर पेटंट मिळवण्यासाठी केलेला खर्च दोन ते अडीच लाखांच्या घरात जात आहे, असे पाचफुले यांनी सांगितले.
20 वर्षांपूर्वी झाला होता अपघात; गुप्ता यांनी घेतला धडा, आता करतायेत जनजागृती, Video
कसं आहे यंत्र?
या यंत्रामध्ये एक जीपीएस सिस्टम बसवण्यात आली आहे. ज्यामुळे अपघात झाल्यानंतर तिथलं लाईव्ह लोकेशन नातेवाईक तसेच इतर यंत्रणांना पोहोचवलं जातं. त्याचबरोबर या यंत्रामध्ये एक जीसीएम म्हणजेच सिम ठेवण्याची जागा देखील आहे. ज्यामुळे आपल्याला संदेश प्राप्त होतो. त्याचबरोबर एक सेंसरची व्यवस्था देखील या यंत्रामध्ये करण्यात आली आहे. राजेंद्र पाचफुले हा तरुण एका सामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. रस्त्यावर होणाऱ्या अपघातग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी आपण हे यंत्र केल्याचे तो सांगतो.





