कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे रसायनशास्त्रज्ञ वरिष्ठ प्रा. डॉ. जी. बी कोळेकर आणि डॉ. रविंद्र वाघमारे यांनी हे संशोधन केले आहे. तर 2017 सालापासून ते यावर संशोधन करत आहेत. नुकतेच त्यांच्या या संशोधनासाठी त्यांनी भारतीय पेटंट मिळवले आहे. विद्यापीठातील प्रयोगशाळेबरोबरच या संशोधनाच्या चाचण्या प्रत्यक्ष शेतातही घेण्यात आल्या आहेत, असे प्राध्यापक डॉ. जी. बी कोळेकर यांनी सांगितले.
advertisement
कोल्हापूरकरांनी गाजवलं कर्नाटक, चित्तथरारक मोटार स्पर्धेत रचला इतिहास
संशोधनाच्या संदर्भात कसे सुचले ?
खरंतर रसायनशास्त्रज्ञ कोळेकर यांनी शेतातील रासायनिक खतांच्या वापराने होणाऱ्या दुष्परिणामांचे निरीक्षण केले. बरेचसे शेतकरी आपल्या शेतातील पिकाची वाढ जोमाने व्हावी, यासाठी रासायनिक खतांचा अमाप वापर करत असतात. याचाच परिणाम शेतातील नैसर्गिक घटकांवर आणि मानवी आरोग्यावर देखील होताना पाहायला मिळतो. यामुळे कित्येकांना कॅन्सर सारख्या रोगांचा सामनाही करावा लागतोय. त्यामुळेच आपण यावर काय करू शकतो, असा विचार कोळेकर यांच्या डोक्यात सारखा येत होता. तसेच डॉ. रविंद्र वाघमारे हे कृषी रसायने आणि कीटक व्यवस्थापन विषयात काम करतात. त्यामुळे त्यांना शेतीशी संबंधित या विषयावर संशोधनाचा हा विषय दिला होता. त्यांनी यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असे डॉ. कोळेकर यांनी सांगितले.
हा होता संशोधनाचा हेतू
खरंतर प्रत्येक संशोधन हे एखाद्या हेतूला धरूनच केले जाते. अगदी तसेच डॉ कोळेकर आणि डॉ वाघमारे या संशोधकांनी शेतातील रासायनिक खतांचा वापर कमी करण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवला. कोल्हापुरातील कित्येक भागांमध्ये वाढणारे कॅन्सरचे पेशंट लक्षात घेता त्यांनी हे ध्येय ठरवले होते.
गणपती बाप्पाला बांधा कोल्हापुरी फेटा, पाहा सोपी पद्धत
नेमके काय आहे संशोधन?
स्वयंपाक घरात रोज चहा बनवल्यानंतर टाकून देण्यात येत असलेल्या चहापुडीचे हे संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या टाकाऊ चहापूडपासून कार्बन डॉट नॅनो मटेरियल तयार केले आहे. याची द्रव स्वरूपात शेतातील पिकांवर फवारणी केल्यानंतर पिकांची वाढ अगदी जोमाने होण्यास मदत होते. सर्व प्रकारच्या पालेभाज्या फळभाज्या यांच्यावर ही फवारणी करता येते. तर हे संशोधन पूर्णपणे पर्यावरण पूरक आणि कमी खर्चिक असल्यामुळे शेतकऱ्याला देखील याचा फायदाच होणार आहे. या मध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता जास्त असल्यामुळे जिरायती शेतीसाठी देखील अधिक प्रमाणात उपयुक्त ठरू शकते, असेही डॉ कोळेकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शेतीतील उत्पन्न वाढीसाठी हे संशोधन उपयुक्त ठरणार असून याचा फायदा कित्येक शेतकऱ्यांना होणार आहे. तर या संशोधनामुळे शिवाजी विद्यापीठाचे नाव अजूनच उंचावले गेले आहे.