मुंबई : राज्याचे रमीफेम मंत्री माणिकराव कोकाटेंना दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. शिवाय त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय. अटक टाळण्यासाठी कोकाटेंची कायदेशीर पळापळ सुरु आहे. दरम्यान मोठी बातमी समोर येत असून माणिकराव कोकाटेंकडून त्यांचं खातं काढून घेण्यात आलं आहे.
क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. त्यामुळे कोकाटेंनी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र हायकोर्टानं तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिलाय. तर माणिकराव कोकाटे उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेत. कोकाटेंची अटक अटळ मानली जात असल्यानं विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. अखेर कोकाटेंच्या राजीनाम्याची वाट न बघता त्यांच्याकडून खाते काढून घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेली शिफारस राज्यपालांनी मान्य केली आहे. या संदर्भातील पत्र देखील समोर आले आहे.
advertisement
माणिकराव कोकाटे सध्या बिनखात्याचे मंत्री
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचे खाते काढून घेतल्यानंतर त्यांच्या खात्यांची जबाबदारी अजित दादा यांच्याकडे सुपूर्द केला आहे. क्रीडामंत्री पदाचा पदभार आता अजित पवारांकडे असणार आहे. माणिकराव कोकाटे यांनी अद्याप मंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही. त्यांच्याकडून खाती काढून घेण्यात आली आहे. त्यामुळे सध्या ते बिनखात्याचे मंत्री आहेत. शासनाची फसवणूक करत मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका बळकावल्या प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे . तसेच आज नाशिक जिल्हा न्यायालयाने अटकेचे निर्देश दिले आहे.
नेमकं प्रकरण काय?
1995 मध्ये माणिकराव कोकाटेंनी सीएम कोट्यातील अत्यल्प गटातून सदनिका घेतली होती. त्यासाठी वार्षिक उत्पन्न कमी दाखवणं, मालमत्ता नसल्याची बनावट कागदपत्र दिल्याची तक्रार करण्यात आली होती. तक्रारीनंतर 25 ऑक्टोबर 1995 मध्ये सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. 25 मार्च 1997 मध्ये कोकाटेंच्या विरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली होती. 3 एप्रिल 2001 रोजी कोर्टात खटला सुरू झाला होता. तर 20 फेब्रुवारी 2025 रोजी नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयाने माणिकराव कोकाटेंना दोषी ठरवलं होतं. तर 16 डिसेंबर 2025 रोजी सत्र न्यायालयानं कनिष्ट न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. एकंदरीतच माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेमुळे महापालिका निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांना आयताच मुद्दा मिळालाय. त्यामुळे विरोधकांना बळ मिळालं असून सत्ताधारी बॅकफूटवर गेल्याच पाहायला मिळत आहे.
हे ही वाचा :
