महायुतीने आपल्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना धक्कातंत्राचा वापर केला आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षातील इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले आहे.मंत्रिमंडळ विस्तारानंतर एकीकडे छगन भुजबळांची नाराज आहेत. तर, दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार मागील 24 तासांपासून कुणालाच भेटले नाहीत. काल, सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देखील अजित पवार सभागृहात उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
advertisement
अजित पवारच अस्वस्थ?
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या जवळपास 13 दिवसांनी सत्ता स्थापन झाली. महायुतीला प्रचंड बहुमत मिळून देखील सत्ता स्थापनेचा तिढा सुरू असल्याची चर्चा होती. सत्ता वाटपाचा घोळ सुरू असल्याने सरकार उशिराने स्थापन झाले. निवडणूक निकालाच्या 20 दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. आता, हिवाळी अधिवेशनात अजित पवार नॉट रिचेबल असल्याचे दिसून आले. त्यामुळे अजित पवारच नाराज आहेत का, याची चर्चा रंगली आहे.
विधीमंडळ अधिवेशन सोडून अजितदादा दिल्लीत?
राज्याचे विधीमंडळ अधिवेशन सुरू असले तरी अजित पवारांची अनुपस्थिती दिसून येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजितप पवार हे दिल्लीत भाजप पक्ष श्रेष्ठींच्या भेटीला गेले आहेत. महायुतीमधील खाते वाटपाच्या मुद्यावर अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बायपास करत दिल्ली गाठली असल्याची चर्चा आहे. मागील सरकारच्या काळात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे असलेली खात्यांचा तिढा असल्याचे म्हटले जात आहे. अजित पवारांनी अर्थ आणि महिला-बाल विकास खाते पुन्हा मिळावे यासाठी दिल्लीत धाव घेतली असल्याचे म्हटले जात आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तरी अद्याप खाते वाटप झाले नाही.
