सातारा : ऐतिहासिक असा हा जिल्हा नैसर्गिक धनसंपत्तीनं नटलेला आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या साताऱ्यात मोठमोठे डोंगर आहेत. पावसाळ्यात कास पठार, यवतेश्वर पठार, यवतेश्वर घाट याठिकाणी बसून निसर्गाचं मनमोहक रूप अगदी जवळून न्याहाळता येतं. त्यामुळे पर्यटक याठिकाणी हमखास भेट देतात.
कास हे वर्ल्ड हेरिटेज म्हणून ओळखलं जातं. पावसाळ्यात या पठारावर विविध प्रजातींची फुलं येतात. जी बघण्यासाठी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून आणि जगभरातून अनेक पर्यटक इथं दाखल होतात. तुम्हीसुद्धा जर पावसाळ्यात पिकनिक प्लॅन करत असाल आणि त्याच त्याच ठिकाणी फिरून कंटाळला असाल तर साताऱ्यातील अद्भुत असं नैसर्गिक दृश्य आपल्या कुटुंबियांसोबत, मित्रमंडळींसोबत किंवा एकटे नक्कीच अनुभवू शकता.
advertisement
हेही वाचा : 'देखणे ते दृश्य, पाहून मोहित होती पर्यटक!', साताऱ्यातील रिव्हर्स वॉटर फॉलची पर्यटकांना भूरळ, photos
इथं घनदाट हिरवंगार जंगल, पावसाच्या मुसळधार धारा, अधूनमधून धुकं असा अगदी डोळ्यांचे पारणे फेडणारा निसर्ग पाहता येतो. कास पठारासह कास तलाव हेसुद्धा पर्यटकांचं प्रिय ठिकाण आहे. या तलावातल्या पाण्याचं मूळ सौंदर्य आणि वरून पडणारा पाऊस असं अत्यंत नयनरम्य दृश्य इथं पाहायला मिळतं. अनेकजण म्हणतात, इथं आल्यावर आपण देशात आहोत की परदेशात हेच कळत नाही एवढं सुरेख दृश्य आपल्या महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यात आहे.
हिरवेगार डोंगर, थंड वारा, धुक्याची चादर, असा जणू ढग जमिनीवर अवतरल्याचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक कास पठारावर आवर्जून येतात. यंदाच्या पावसाळ्यात तुम्हीसुद्धा इथं जाऊ शकता. परंतु लक्षात घ्या, पावसामुळे वाटा निसरड्या होतात, पाण्याचा प्रवाह वाढतो, शिवाय या दिवसांत विषारी प्राण्यांचा सुळसुळाट असतो. त्यामुळे पावसाळी पर्यटन करताना जरा जपून.