यवतमाळ : विषारी कफ सिरपचा धोका आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचला आहे. मध्य प्रदेशमध्ये तर हे औषध घेतल्याने अनेक मुलांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान यवतमाळमधून एक धक्कादायक प्रकार समोर आळा आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या पिंपळखुटी येथे एका 6 वर्षीय मुलाचा सर्दी खोकल्याची औषध घेतलं. त्या नंतर दुसऱ्या दिवशी त्याची प्रकृती बिघडली असता खाजगी डॉक्टरने त्याला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. नातेवाईक बालकाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेने चांगलीच खळबळ झाली. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने मेडिकलमधून पाच औषधांचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवले.
advertisement
कळंब तालुक्यातील पिंपळखुटी येथील सहा वर्षाचा शिवमला सर्दी खोकल्याचा त्रास झाल्याने त्याला यवतमाळच्या खाजगी रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी काही औषधं लिहून दिली होती. औषधे घेतल्यावरही त्रास कमी न झाल्यामुळे दोन दिवसांनी परत डॉक्टरांना दाखविले त्यांनी पुन्हा औषध दिले. औषधे सुरू असताना अचानक तो बेशुद्ध झाला. खाजगी रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात पाठविले. जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. औषधांमुळे शिवमचा मृत्यू झाल्या असावा अशी शंका आहे. परंतु शवविच्छेदन अहवाल आणि औषधांचा अहवाल आल्यावरच नेमका काय प्रकार झाला हे कळेल असे शिवमच्या कुटुंबीयांनी सांगितले
तपासणीचा अहवाल बाकी
घडलेल्या प्रकारनंतर अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद काळेश्वरकर यांनी माहिती देताना सांगितले की, वसंतराव नाईक जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून बुधवारी एक पत्र प्राप्त झाले. जिल्हा रुग्णालय बालकाला मृत अवस्थेत आणण्यात आले होते. याची चौकशी केली असता दोन चार दिवसांपूर्वी त्याला काही सर्दी, खोकल्याची औषधे देण्यात आली होती. त्या सात औषधांची यादी प्राप्त झाली होती. त्याची नमुने घेतले आणि तपासणीसाठी पाठवलं. खबरदारीचा उपाय म्हणून या औषधांचा वापर व वितरण थांबवण्याची आदेश शासनाने दिले आहे. तपासणीचा अहवाल अद्याप यायचा असल्याचे सांगितले.