सोलापूर : शेतकऱ्याच्या मुलानं शेतकरी का होऊ नये? हा प्रश्न पूर्वी वारंवार उपस्थित व्हायचा. आजही तो आहेच, मात्र आता तरुण शेतकरी मोठ्या संख्येनं शेती व्यवसायांमध्ये प्रगती करू लागले आहेत, हेही खरंय. अनेक तरुण कृषीविषयक अभ्यास करून किंवा इतर विषयात उच्चशिक्षण घेऊन शेतात वेगवेगळे प्रयोग करतात आणि त्यातून बक्कळ उत्पन्न मिळवतात. सोलापूरच्या एका उच्चशिक्षित शेतकऱ्यानं तर चक्क डाळिंबाच्या लागवडीतून 2 लाखांचा निव्वळ नफा कमवलाय.
advertisement
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव इथले तरुण शेतकरी नागनाथ भीमराव जोकारे यांनी आधुनिक पद्धतीनं भगवा वाण या जातीच्या डाळिंबाची लागवड केली. एका एकरात 12 बाय 8 फुटाच्या अंतरावर त्यांनी डाळिंबाची 450 रोपं लावली. लागवडीनंतर वर्षभरात फळधारणा झाल्यावर 1 लाख रुपये खर्च आला आणि उत्पन्न मिळालं 2 लाख रुपये. म्हणजेच 1 लाख रुपये खर्च वजा करून 1 लाख रुपयांचा नफा झाला.
हेही वाचा : शेतकऱ्यानं केला प्रयोग, घेतलं लाल मिरचीचं उत्पादन! आज एकरी नफा 3 लाखांचा
सुरूवातीला डाळिंबाची झाडं लहान असताना त्यातून जास्त उत्पन्न मिळालं नाही, मात्र दुसऱ्याच वर्षी एका एकरातून 4 टन डाळिंब निघाले, तेव्हा 2 लाख रुपये खर्च आला आणि 4 लाख रुपयांची कमाई झाली. म्हणजेच खर्च वजा करून नागनाथ यांना 2 लाख रुपयांचा फक्त नफा मिळाला. अशाप्रकारे जसजशी डाळिंबाची झाडं मोठी झाली, तसतसं उत्पन्न वाढत गेलं.
डाळिंब हे तसं कमी पाण्यावर येणारं पीक. त्याला केवळ बहार आल्यावर 1 ते 2 महिने जास्त पाणी लागतं. सोलापुरात डाळिंबाच्या अनेक बागा आहेत, पण रोपांवरील रोगराईमुळे शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान होतं. म्हणूनच नागनाथ हे आपल्या बागेला कोणताही रोग लागू नये म्हणून वेळच्या वेळी औषध फवारणी करतात आणि खतपाणी घालतात. अशा पद्धतीनं डाळिंब बागेची व्यवस्थित काळजी घेतल्यामुळेच नागनाथ जोकारे या उत्पादनातून लाखोंचा नफा मिळवतात. ते सध्या जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरले आहेत.