या विशेष पेटीची देवगड तालुक्यातील पडवणे गावचे बागायतदार प्रकाश धोंडू शिर्सेकर यांनी तयारी केली होती. त्यांच्या बागेत जुलै महिन्यातच काही झाडांना आगाऊ मोहोर आला होता. त्यांनी त्या झाडांवर विशेष काळजी घेऊन फवारणी व प्लास्टिक कव्हरिंग केली, ज्यामुळे फळधारणा टिकवण्यात यश आलं. परिणामी दिवाळीच्या आधीच त्यांच्या बागेतील पहिली पेटी बाजारात पोहोचली आणि याच पेटीने एपीएमसीच्या इतिहासात नवा विक्रम नोंदवला.
advertisement
मक्याच्या दरात सुधारणा, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर नानाभाऊ जेजुरकर अँड कंपनीकडे ही पेटी दाखल झाली होती. त्यावेळी या आंब्यांची विधिवत पूजा करून काही दिवसांनी लिलावासाठी ठेवण्यात आली. बोली लागल्यानंतर मुंबईतील एका ग्राहकाने ही 6 डझनांची पेटी तब्बल 25 हजार रुपयांना विकत घेतली. व्यापाऱ्यांनी त्या ग्राहकाचं नाव गोपनीय ठेवलं असलं तरी, एवढ्या उच्च दराने खरेदी झाल्याची बातमी बाजारभर चर्चेचा विषय ठरली.
साधारणपणे हापूस आंब्याच्या पेटीला 20 ते 22 हजारांचा दर मिळतो; मात्र यंदा दिवाळीपूर्वीच या ‘मुहूर्ताच्या हापूस’ने विक्रमी भाव गाठला. यामुळे कोकणातील बागायतदार आणि व्यापाऱ्यांमध्ये मोठा आनंद पसरला आहे.
दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोकणातील हापूस मुंबई बाजारात दाखल होतो. पण यंदा पावसाच्या विलंबामुळे हंगाम थोडा मागे ढकलला जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तरीसुद्धा दिवाळीतच हापूस आंबा मुंबईत येणे ही एपीएमसीच्या इतिहासातील पहिलीच घटना ठरली आहे.
मुंबईकरांसाठी दिवाळीचा गोडवा यंदा आंब्याच्या सुवासाने अधिकच वाढला आहे. फळांचा राजा हापूस पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवतोय की, त्याचा दर आणि दिमाख दोन्ही अव्वलच असतात.






