सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान मोदी हे दौरा अर्धवट टाकून सकाळीच भारतात परतले. विमानतळावरच त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि इतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर साऊथ ब्लॉकमधील संरक्षण मंत्रालयात तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि संरक्षण मंत्रालयाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भारतीय सैन्यदलाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आज संध्याकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय होणार आहेत.
advertisement
साऊथ ब्लॉकमधील बैठकीत काय ठरलं?
उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बैठकीत पहलगाममधील घटनेबाबत चर्चा करण्यात आली. भारताच्या हद्दीत आणि सीमेपलिकडील भागामध्ये घुसून दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी सैन्य दल तयार असल्याचे सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितली. दहशतवाद्यांच्या कृत्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सगळे पर्याय खुले आहेत. मात्र, कोणत्या पर्यायावर अंमल करायचा, याचा निर्णय वरिष्ठ अधिकारी आणि सरकार घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पर्यटकांवरील हल्ला म्हणजे एक प्रकारचे युद्ध आहे. त्यामुळे आता त्याला त्याच प्रकारे प्रत्युत्तर देण्याची तयारी करण्यात आली आहे.
दहशतवाद्यांसाठी भारतीय सैन्याने शोध मोहीम सुरू केली आहे. त्याशिवाय, सुरक्षा दलाला दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जवळपास 120 दहशतवाद्यांचा खात्मा...
संरक्षण खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमध्ये 120 हून अधिक दहशतवादी सक्रिय आहेत. यातील 110 हून अधिक पाकिस्तानी दहशतवादी असून सुमारे 10 स्थानिक दहशतवादी आहेत. यापैकी काश्मीरमध्ये सुमारे 75 आणि जम्मू प्रदेशात 50 सक्रिय आहेत.
गेल्या दोन वर्षांत, विविध चकमकींमध्ये 144 दहशतवादी मारले गेले. वर्ष 2024 मध्ये 70 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.