येत्या गुरुवारपासून (31 जुलै) प्रायोगिक तत्त्वावर पाणीपुरवठ्याच्या वेळेमध्ये बदल केला जाणार आहे. हा बदल लक्षात येईपर्यंत काही प्रमाणात नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आहे. तरीही नागरिकांनी सहकार्य करून बदललेल्या वेळांशी जुळवून घ्यावे, असे बंडगार्डन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एकनाथ गाडेकर यांनी सांगितले.
advertisement
पाणीपुरवठ्याच्या वेळेतील बदल
पुण्यातील पाणीपुरवठ्याच्या वेळेतील बदलानुसार विश्रांतवाडी, धानोरी, टिंगरेनगर, लोहगाव विमाननगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, नागपूर चाळ, वडगाव शेरी, खराडी, चंदननगर या भागात नवीन वेळेत पाणीपुरवठा होणार आहे. धानोरी गावठाण भागात सध्या पहाटे 6 ते दुपारी 3 या वेळेत पाणीपुरवठा होतो. तो आता रात्री 8.45 वा. ते 11.30, पहाटे 4.45 ते 10 आणि दुपारी 3 ते रात्री 10 अशा तीन टप्प्यांत होणार आहे.
गोकुळनगर, भैरवनगर, मुंजाबा वस्ती भागाला पहाटे 4 ते 11, दुपारी 12 ते 1.30 या वेळेत, आनंद पार्क भागाला दुपारी 3 ते सायंकाळी 6 आणि रात्री 7 ते 3.45 या काळात पाणी दिले जाईल. तर खेसे पार्क, तुषार पार्क, धानोरी जकातनाका, कलवड या भागाला अनुक्रमे सायंकाळी 7.15 ते रात्री 11, दुपारी 3 ते रात्री 10.30, पहाटे 4.15 ते 7.45 आणि 11.45 ते दुपारी 3.15 या नवीन वेळेत पाणीपुरवठा केला जाईल.
महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, नागपूर चाळ, कारागृह रस्ता या भागाला पहाटे 6 ते 9.30-12.30, पहाटे 5 ते 7.45, पहाटे 6 ते सायंकाळी 6 या वेळेत पाणीपुरवठा केला जाईल. तर रामनगर भागात सकाळी 10 ते दुपारी 2.30, गलांडेनगरला रात्री 7 ते 11, वडगाव शेरी भागात दुपारी 3.45 ते सायंकाळी 6.5, मिलिटरी परिसर आणि शुभम सोसायटी भागात सायंकाळी 6 ते रात्री 1 या वेळेत पाणी दिले जाईल, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.