पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाळी वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक भागांत वादळी वाऱ्यासह आणि गारपिटीसह पाऊस झालाय. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस हेच चित्र राज्यात कायम राहणार आहे. 15 मे रोजी राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या सर्व भागांत ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
खूशखबर! 3 दिवसांत 4800 रुपयांनी स्वस्त, आज तोळ्याला किती मोजावे लागणार?
मुंबईत किमान तापमान 27 अंश सेल्सिअस तर कमाल 35 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अंशतः ढगाळ वातावरणासोबत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. पुणे शहरातही ढगाळ वातावरण राहणार असून, कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस व किमान तापमान 24 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. याठिकाणी सुद्धा विजांसह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये 15 मे रोजी सायंकाळी किंवा रात्री वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्याठिकाणी कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. नाशिकमध्येही अशीच स्थिती बघायला मिळू शकते. त्याठिकाणी ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येथील तापमान 23 ते 34 अंशांदरम्यान राहील.
नागपूरमध्ये 15 मे रोजी वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असल्याने उकाडा वाढू शकतो.
राज्यातील सर्वच भागात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. वातावरणात सतत बदल होत असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घ्यावी. त्याचबरोबर पुढील नियोजन व्यवस्थित पणे करावे जेणेकरून शेतमालाचे नुकसान होणार नाही, अशी सूचना प्रशासनाकडून वारंवार देण्यात येत आहे.





