Malegaon News: सावकाराच्या गुंड टोळीचा कुटुंबावर जीवघेणा हल्ला, मालेगाव हादरलं
- Published by:Prachi Amale
Last Updated:
सावकाराने पवार कुटुंबाची शेती बळकावण्याचा डाव रचला. शेतीचा ताबा घेण्यासाठी त्याने आपल्या गुंड टोळीला कोठरे गावात पाठवले.
बब्बू शेख, प्रतिनिधी
नाशिक : मालेगाव तालुक्यातील कोठरे येथे सावकाराच्या गुंडांनी शेतकरी कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीत एका महिलेसह तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना मालेगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोठरे गावातील बापू पवार यांनी सुमारे दहा वर्षांपूर्वी एका सावकाराकडून 20 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाच्या बदल्यात त्यांनी आपली शेती गहाण ठेवली होती. गेल्या काही वर्षांत पवार यांनी व्याजासह तब्बल 72 लाख रुपयांची परतफेड केलेली आहे. तरीदेखील सावकाराने पवार कुटुंबाची शेती बळकावण्याचा डाव रचला. शेतीचा ताबा घेण्यासाठी त्याने आपल्या गुंड टोळीला कोठरे गावात पाठवले.
advertisement
जीवघेणा हल्ला चढवला
गुंडांनी जबरदस्तीने शेतीत घुसून पवार कुटुंबियांना बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र पवार यांनी याला विरोध केल्यावर गुंडांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. या दरम्यान महिलेलाही बेदम मारहाण करण्यात आली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे गावात एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी धाव घेऊन जखमींना मालेगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल केले.
साथीदारांविरोधात गुन्हा दाखल
advertisement
या घटनेची माहिती मिळताच वडनेर खाकुर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी सावकार आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
शेतकरी वर्गात प्रचंड संताप
शेतकरी कुटुंबाने कर्जाची मूळ रक्कम व व्याज मिळून तब्बल तीनपट अधिक परतफेड केल्यानंतरही जमिनीवर डोळा ठेवून सावकाराने गुंडांच्या सहाय्याने हल्ला घडवून आणल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. या घटनेमुळे परिसरात सावकारी प्रथेचा पुन्हा एकदा मुद्दा ऐरणीवर आला असून शेतकरी वर्गात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
September 14, 2025 3:44 PM IST