5 वर्षांची रियांका परत आलीच नाही! घरापासून 2 किमी अंतरावरचं दृश्य पाहून गावकरी हादरले
- Published by:Sachin S
Last Updated:
मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संताप उसळला होता.
हरिष दिमोटे, प्रतिनिधी
अहिल्यानगर : महाराष्ट्रात बिबट्यांच्या हल्ल्यांची संख्या वाढतच चालली आहे. पुण्यानंतर आता अहिल्यानगरमध्येही अशीच एक घटना घडली आहे. निंबळक-शेतात शेकोटी करत असताना एका ५ वर्षांच्या चिमुरडीला बिबट्याने उचलून नेलं. या पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संताप उसळला होता. अखेर वन विभागाने ग्रामस्थांच्या मागण्या मान्य केल्यानंतर ग्रामस्थांनी मवाळ भूमिका घेत मुलीचा अंत्यविधी करण्यात आला.
advertisement
अहिल्यानगर तालुक्यातील खारेकर्जुने येथे घडलेल्या पाच वर्षीय रियांका सुनील पवार या चिमुरडीच्या मृत्यूने संपूर्ण परिसर हादरला आहे. वनविभागाने घटनास्थळी दोन स्नायपर तैनात केले असून ज्या ठिकाणी मुलीचा मृतदेह सापडला, त्या परिसरात विभागाने आपली पोझिशन घेतली आहे. बिबट्या दिसताक्षणी गोळीबार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा वावर सुरू असल्याची माहिती ग्रामस्थांनी वन विभागाला वारंवार दिली होती. मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. या निष्काळजीपणामुळे निर्दोष बालिकेचा जीव गेला.
advertisement
घटना मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गट क्रमांक २२० मध्ये घडली. रियांका घराबाहेर खेळत असताना अचानक तुरीच्या शेतातून आलेल्या बिबट्याने झडप घालत तिला उचलून नेले. आई आणि कुटुंबीयांच्या डोळ्यांसमोर हा प्रसंग घडला. त्यानंतर संपूर्ण गावात आरडाओरडा झाला.
ग्रामस्थ, पोलीस आणि वनविभागाचे पथक तसेच सैन्यदलाच्या जवानांनी रात्रीभर शोधमोहीम राबविली.
घटनेनंतर ग्रामस्थ, पोलीस आणि वनविभागाचे पथक रात्री उशिरापर्यंत शोध घेत होते. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी साडेअकराच्या सुमारास घरापासून दोन किलोमीटर अंतरावर झाडांच्या झुडपात रियांकाचा मृतदेह सापडला. या घटनेने गावात हळहळ आणि भीतीचे वातावरण पसरले असून, ग्रामसभेत मुलीच्या आईने हंबरडा फोडल्याने उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आले.
advertisement
या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. गावकऱ्यांनी यापूर्वीच या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं वनविभागाला सांगितलं होतं. गेल्या चार-पाच महिन्यांपासून पिंजरा लावण्याची मागणीही करण्यात आली होती.-मात्र वनविभागाकडून पुरावे द्या, त्यानंतरच पिंजरा लावू असं उत्तर देण्यात आलं.वनविभागाच्या निष्काळजीपणामुळेच या निर्दोष बालिकेचा जीव गेला, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या घटनेनंतर आता प्रशासन आणि वनविभागावर तीव्र टीका होत आहे. ग्रामस्थांनी कायमस्वरूपी उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. एका निर्दोष चिमुरडीचा बळी गेल्यानंतर आता तरी वनविभाग जागा होणार का हा प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरितच आहे.
view commentsLocation :
Nagardeole,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
November 13, 2025 11:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
5 वर्षांची रियांका परत आलीच नाही! घरापासून 2 किमी अंतरावरचं दृश्य पाहून गावकरी हादरले


