Diabetes : भारतातील मधुमेहाची गंभीर परिस्थिती, दहापैकी चौघांना मधुमेहाचा धोका, जाणून घ्या आकडेवारी
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
भारतात मधुमेहाचं प्रमाण वाढतंय. मधुमेह आणि उच्च रक्तदाब या दोन्ही आजारांचं निदान वेळेवर करून आणि योग्य औषधं घेतल्यास नियंत्रित करता येतात. लवकर निदान, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर औषधं घेतली तर होणारं गंभीर नुकसान टाळता येतं.
मुंबई : आपण ज्या देशात राहतो त्या भारत देशात मधुमेहानं पाय पसरलेत, याचं प्रमाण खूपच वाढतंय. यासंदर्भात लॅन्सेटमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतात, प्रत्येक दहापैकी चार मधुमेही रुग्णांना आपल्याला मधुमेह आहे हे माहित नसतं.
आपल्या देशात असे अनेक आजार आहेत जे हळूहळू शांतपणे शरीरात प्रवेश करतात आणि हळूहळू आपलं शरीर आतून खराब करायला सुरुवात करतात. हा अभ्यास 2017 ते 2019 दरम्यान 45 वर्षं आणि त्याहून अधिक वयाच्या नागरिकांवर करण्यात आला. या वयोगटातील वीस टक्के नागरिक मधुमेहानं ग्रस्त आहेत. पुरुष आणि महिला दोघांमधेही त्याचं प्रमाण जवळजवळ सारखंच आहे.
advertisement
शहरी भागात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या ग्रामीण भागाच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट आहे. याचं कारण जीवनशैली, खाण्याच्या सवयी आणि शारीरिक हालचालींमधील फरक असल्याचं या अभ्यासातून दिसून आलं.
भारतातील मधुमेहाची गंभीर परिस्थिती
20 ते 79 वयोगटातील प्रौढांमधे मधुमेहाच्या रुग्णांच्या संख्येत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2019 मधे भारतातील एकूण मृत्यूंपैकी सुमारे तीन टक्के मृत्यू मधुमेहामुळे झाले होते. यासोबतच उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्याही झपाट्यानं वाढते आहे. दोन्ही आजार वेळेवर ओळखून नियंत्रण मिळवलं नाही तर त्यामुळे हृदय, मूत्रपिंड आणि डोळ्यांचे विकार अशा अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.
advertisement
गावांत उपचारांचा अभाव
भारतातील ग्रामीण भागात मधुमेह आणि उच्च रक्तदाबावर उपचार करण्याच्या सुविधा खूपच कमी आहेत. आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेनं सात राज्यांमधील एकोणीस जिल्ह्यांत सर्वेक्षण केलं. यात केवळ चाळीस टक्के उपकेंद्रं या आजारांवर उपचार करण्यासाठी सुसज्ज असल्याचं आढळून आलं.
advertisement
मधुमेहावरील औषध मेटफॉर्मिन एक तृतीयांश केंद्रांमधे उपलब्ध नव्हतं. जवळजवळ अर्ध्या केंद्रांमधे म्हणजे जवळपास 45% केंद्रांमधे उच्च रक्तदाब औषध अमलोडिपाइनचा तुटवडा होता.
मधुमेह आणि उच्च रक्तदाब या दोन्ही आजारांचं निदान वेळेवर करून आणि योग्य औषधं घेतल्यास नियंत्रित करता येतात. लवकर निदान, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर औषधं घेतली तर होणारं गंभीर नुकसान टाळता येतं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 14, 2025 7:35 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diabetes : भारतातील मधुमेहाची गंभीर परिस्थिती, दहापैकी चौघांना मधुमेहाचा धोका, जाणून घ्या आकडेवारी


