तुम्हाला स्वत:च्या घरात की रेंटवर राहणं परवडेल? योग्य काय? ९९ % लोकांचा होतो गोंधळ
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
property Rules : नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणाच्या निमित्ताने आज लाखो भारतीयांना आपल्या मूळ गावापासून दूर, दुसऱ्या शहरात स्थायिक व्हावं लागत आहे.
मुंबई : नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणाच्या निमित्ताने आज लाखो भारतीयांना आपल्या मूळ गावापासून दूर, दुसऱ्या शहरात स्थायिक व्हावं लागत आहे. सुरुवातीला एकटे राहणारे अनेक जण पुढे कुटुंबालाही त्या शहरात आणतात. अशावेळी त्यांच्या समोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. स्वतःचं घर खरेदी करायचं की भाड्याने राहणंच अधिक योग्य ठरेल?
वाढत्या किमतींमुळे घर खरेदी अवघड
आजच्या घडीला महानगरांमध्ये घर खरेदी करणे सर्वसामान्य मध्यमवर्गासाठी मोठं आर्थिक आव्हान ठरत आहे. एकीकडे कोट्यवधी रुपयांची घराची किंमत आणि दुसरीकडे 20 ते 25 वर्षांपर्यंत चालणारे गृहकर्ज, त्यावरील व्याज, देखभाल खर्च आणि विविध करांचा बोजा अनेकांना विचारात पाडतो. दुसरीकडे भाड्याच्या घरात राहताना दरवर्षी भाडं वाढतं आणि मालमत्ता स्वतःच्या नावावर नसल्याची खंत कायम राहते.
advertisement
भाडं की ईएमआय? सामान्य कुटुंबांची कोंडी
दरमहा भाडं देण्यापेक्षा ईएमआय भरून स्वतःचं घर असावं, असा विचार अनेकांच्या मनात येतो. मात्र भरमसाठ ईएमआय, दीर्घकालीन कर्ज आणि अनिश्चित भवितव्य यामुळे घर खरेदीचा निर्णय अनेकदा पुढे ढकलला जातो. त्यामुळे ‘भाड्याने राहणं योग्य की घर खरेदी करणं फायदेशीर?’ हा प्रश्न आज जवळजवळ प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबासाठी सामान्य झाला आहे.
advertisement
काय आहे 1 टक्का नियम?
याच संभ्रमातून मार्ग काढण्यासाठी ‘1 टक्का नियम’ उपयुक्त ठरू शकतो, असं आर्थिक तज्ज्ञ सांगतात. या नियमानुसार, एखाद्या घराच्या किमतीच्या किमान 1 टक्के इतकं मासिक भाडं मिळत असेल, तर ती मालमत्ता गुंतवणुकीसाठी चांगली मानली जाते. उदाहरणार्थ, एखाद्या फ्लॅटची किंमत 1 कोटी रुपये असेल, तर त्याचं मासिक भाडं साधारणपणे 1 लाख रुपयांच्या आसपास असायला हवं.
advertisement
साधं गणित, सोपा अंदाज
हा नियम वापरण्यासाठी सर्वप्रथम त्या परिसरातील समान घरांचं सरासरी भाडं तपासावं. त्यानंतर पुढील सूत्र वापरलं जातं. जसे की, (मासिक भाडे ÷ घराची किंमत) × 100 जर मिळणारा आकडा 1 टक्क्यांच्या जवळपास असेल, तर घर खरेदीचा विचार करता येतो.
फक्त भाड्यापुरताच विचार पुरेसा नाही
मात्र घर खरेदी करताना केवळ भाड्याच्या तुलनेत ईएमआय पाहून निर्णय घेणं योग्य ठरत नाही. मेंटेनन्स खर्च, मालमत्ता कर, स्टॅम्प ड्युटी, नोंदणी शुल्क आणि गृहकर्जावरील व्याज यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक असते. हे सर्व खर्च परताव्यावर मोठा परिणाम करतात.
advertisement
भारतात 1 टक्का नियम किती लागू?
रिअल इस्टेट तज्ज्ञांच्या मते, 1 टक्का नियम भारतात पूर्णपणे लागू होत नाही. भारतात निवासी मालमत्तेवर मिळणारा सरासरी भाडे परतावा साधारणतः 2 टक्क्यांच्या आसपास आहे, तर विकसित देशांमध्ये हा परतावा तुलनेने जास्त असतो. त्यामुळे भारतात हा नियम केवळ एक ढोबळ मार्गदर्शक मानला जातो.
महानगरांमध्ये भाडं फायदेशीर?
मुंबई, दिल्ली, बेंगळुरू यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये घरांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत, मात्र त्याच प्रमाणात भाडं वाढलेलं नाही. त्यामुळे अशा शहरांमध्ये अनेकांसाठी भाड्याने राहणं अधिक व्यवहार्य ठरतं. उलट, लहान किंवा वेगाने विकसित होत असलेल्या शहरांमध्ये घर खरेदी करणे दीर्घकालीन दृष्टीने फायदेशीर ठरू शकतं.
advertisement
अंतिम निर्णय वैयक्तिक परिस्थितीवर अवलंबून
शेवटी, घर खरेदी करायचं की भाड्याने राहायचं, हा निर्णय केवळ आकडेमोडीवर आधारित नसतो. नोकरीची स्थिरता, कुटुंबाच्या गरजा, कर सवलती, भविष्यातील स्थलांतराची शक्यता आणि मानसिक समाधान या सगळ्या बाबी तितक्याच महत्त्वाच्या असतात. त्यामुळे 1 टक्का नियम हा फक्त दिशा दाखवणारा निकष असून, अंतिम निर्णय घेताना स्वतःच्या परिस्थितीचा सखोल विचार करणंच अधिक योग्य ठरेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 19, 2026 1:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तुम्हाला स्वत:च्या घरात की रेंटवर राहणं परवडेल? योग्य काय? ९९ % लोकांचा होतो गोंधळ









