फडणवीसांसमोर SC चे निकाल ठेवले आणि सांगितले निर्णय घ्याल तर उद्याच कोर्टात जातो, भुजबळांचा एल्गार
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Chhagan Bhujbal: मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईत तीव्र आंदोलन सुरू असताना सोमवारी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाचा पुढचा लढा स्पष्ट केला.
मुंबई : मराठा हे सामाजिकदृष्ट्या सामाजिक मागास नाहीत, तर पुढारलेले आहेत. मराठा कुणबी समाजाचे एकत्रीकरण होऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा सांगितलेले आहे. परंतु तरीही सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याची मागणी होत आहे. आम्ही आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. आरक्षणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाचे याआधीचे निर्णय अर्थात निकाल आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर ठेवले. जर जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार आपण सरसकट मराठा समाजाला कुणही दाखले देण्याचा निर्णय घेतला तर आम्ही दुसऱ्या दिवशी न्यायालयात जाऊ, अशी ताकीद आम्ही त्यांना दिली, असे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे नेते, मंत्री छगन भुजबळ म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या भेटीवेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील हजर होते. त्यांच्यासमोरच आमची सगळी चर्चा झाली, असे भुजबळ यांनी आवर्जून सांगितले.
मराठा समाजाला इतर मागास प्रवर्ग अर्थात ओबीसीतूनच आरक्षण मिळावे, अशी मागणी करून मनोज जरांगे पाटील यांचे सहकाऱ्यांसह मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. जरांगे पाटील यांच्या मागणीने सरकार कोंडीत सापडले आहे. दुसऱ्या बाजूला ओबीसींच्या ताटातून काढून दुसऱ्या ताटात देण्याला छगन भुजबळ यांनी प्रखरपणे विरोध दर्शवला आहे. सोमवारी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाचा पुढचा लढा स्पष्ट केला.
advertisement
आरक्षण प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या हातात नाही मग ते फडणवीस असो वा शरद पवार...
मराठा आणि कुणबी यावर सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा मत स्पष्ट केले आहे. असे असताना जर मर्यादा ओलांडून जर मराठा समाजाला वाढीव आरक्षण दिले तर आम्ही मैदानावर उतरू. सरकारने जर तसा निर्णय घेण्याचे धाडस केले तर आम्ही दुसऱ्या दिवशी न्यायालयात जाऊ, असा इशाराच छगन भुजबळ यांनी दिला. काही कुणबी आहेत, त्यांच्या नोंदी आहेत, त्यांच्याबद्दल आमचे काही म्हणणे नाही. मात्र सरसकट समाजाला कुणबी ठरवता येणार नाही, हे कायद्याने स्पष्ट असतानाही जर असा कुणी हट्ट करीत असेल तर हे आम्हाला मान्य नाही. तसेच एखाद्या जातीला अमुक एका प्रवर्गात टाकणे हे कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या हातात नाही. मग ते फडणवीस असो वा शरद पवार असो. उगीचच कोणत्याही शासनाला दोष देण्यात काही अर्थ नाही. आरक्षणाचा विषय हा मुख्यमंत्र्यांच्या हातात नाही, असा दावा भुजबळ यांनी केला.
advertisement
... तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ
ओबीसी आरक्षणात सरकारने कुणालाही वाटेकरी करू नये. जर सरकारने तसा काही निर्णय घेतला तर आम्हीही उपोषणे करणार, जिल्हा जिल्ह्यातून मिरवणुका काढू, लाखालाखांच्या लोंढ्यांनी मुंबईत येऊन आम्ही आमचा लढा तीव्र करू, असा इशारा भुजबळ यांनी दिला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 01, 2025 6:52 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
फडणवीसांसमोर SC चे निकाल ठेवले आणि सांगितले निर्णय घ्याल तर उद्याच कोर्टात जातो, भुजबळांचा एल्गार