शरद पवारांवर भरभरून बोलले, छगन भुजबळांनी मन मोकळं केलं, ज्यांचा देशात लौकिक...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Chhagan Bhujbal: कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव आयोजित भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
सचिन तोडकर, प्रतिनिधी, जुन्नर (पुणे) : राज्याचे मंत्री ज्येष्ठ नेते छगन भुजबळ जरी महायुतीत असले, राजकीयदृष्ट्या त्यांनी शरद पवार यांची साथ सोडलेली असली तरी पवारांवर असलेले त्यांचे प्रेम काही कमी झालेले नाही. शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाचा उल्लेख करून शेती खात्याचा मंत्री म्हटले की देशात शरद पवार यांचेच नाव घेतले जाते, असे उद्गार छगन भुजबळ यांनी काढले. महायुतीतीत इतर पक्षांचे नेते शरद पवार यांच्या कामावरून अनेकदा टीका करतात, मात्र छगन भुजबळ यांनी पवारांचे योगदान सांगून सत्ताधारी नेत्यांना आरसा दाखवला आहे.
कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव आयोजित भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे नेते पंकज भुजबळ आदी नेते उपस्थित होते.
भुजबळ यांच्याकडून शरद पवार यांचे कौतुक
देशात कृषिमंत्री म्हणून ज्यांचा लौकिक आहे, त्या शरद पवार साहेबांचे शेतीसाठी मोठे योगदान आहे. ते आपल्याला मान्य करायलाच हवे, असे छगन भुजबळ म्हणाले. शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत शेतकऱ्यांसाठी मोलाचे काम केले. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, शेतीमालाचे प्रश्न पवारसाहेबांनी सोडवले, असे भुजबळ म्हणाले.
advertisement
शेतकऱ्यांच्या पोटावर पाय येईल, असे आम्ही सरकार म्हणून काही करणार नाही
पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, "सरकार आपल्याला भरीव मदत करते, मात्र त्याचा उपयोग आपण कसा करतोय, हे महत्त्वाचे आहे. मुळात मी हे बोलणं उचित नाही, कारण मी अन्न पुरवठा मंत्री आहे. तुम्ही जे अन्न तयार करता, त्यानंतर माझे काम सुरू होते. त्यामुळे तुम्ही अन्न बनवलं नाही तर माझे काम बंद पडेल. अन्न-धान्य साठवणूक हा देशात महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पोटावर पाय येईल, असे आम्ही सरकार म्हणून काही करणार नाही. म्हणूनच स्वदेशी हा नारा दिला आहे. नरेंद्र मोदी यांनीही स्वदेशीकडे चला हा नारा दिलाय".
advertisement
"शेतकऱ्यांना महत्वाच्या दोन अडचणी आहेत. काही संकटं तर अस्मानी आहेत. पाणी आलं, नाही आलं, वाहून गेलं. हे अस्मानी संकट आहे. दुसरं संकट हे मानवनिर्मित आहे. पीक उगवलं की बंधनं आणली जातात. हे बंधन, ते बंधन. कधी आयात-निर्यात करा, मग लगेच करु नका. इथेनॉल करा, इथेनॉल बंद नका. कांदा सुरू, कांदा बंद. कशासाठी हे सगळं? आता याला तोंड द्यायचं म्हटल्यावर आपल्याला मानवी संकटं आणणाऱ्या यंत्रणा, त्यांना सुद्धा सांगावं लागेल. आपण स्वदेशीचा नारा देतो, त्यावेळी स्वदेशी मनुष्य सुद्धा जगवावा लागेल, असेही भुजबळ म्हणाले.
advertisement
कपडे गाड्यांवर आपण बंधने आणत नाही, शेतकऱ्यांच्या मालावर का बंधने आणतो?
जिथे दोन पैसे मिळू शकतात, ती दारं आपल्याला उघडावी लागतील. तुम्ही त्यांच्यावर आणखी-आणखी बंधनं आणून चालणार नाही. कपडा, गाड्या अनेक वस्तूवर आपण बंधनं आणत नाही. मात्र शेतकऱ्यांच्या मालावर तेवढं बंधनं आणतो, अशी खंतही भुजबळ यांनी बोलून दाखवली. शेतकऱ्यांच्या शेतीमालावरील बंधने हटवायला हवीत. पुण्यातील, नाशिकमधील अनेक नेत्यांनी यासाठी लढा दिला. पवार साहेबांनी सुद्धा याबाबत अनेकदा मदत केली, आजही ते शेतकऱ्यांच्या दृष्टीने ते मदत करत असतात, असे भुजबळ म्हणाले.
Location :
Junnar,Pune,Maharashtra
First Published :
August 18, 2025 3:36 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शरद पवारांवर भरभरून बोलले, छगन भुजबळांनी मन मोकळं केलं, ज्यांचा देशात लौकिक...