'...अन् डोळ्यासमोर जळून बस खाक झाली', पहाटे 3 वाजता 27 प्रवासी कसे वाचले प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
सेलगावजवळ चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागली, भीमराव घोडे व इर्शाद शेख यांच्या प्रसंगावधानामुळे २७ प्रवासी सुखरूप बचावले, महामार्ग सुरक्षा प्रश्न ऐरणीवर.
पहाटेची वेळ होती, गाड्यांचा वेग आणि प्रवाशांच्या डोळ्यावर झोप होती. पहाटे तीन वाजता बस चहा पाण्यासाठी थांबली होती. त्यानंतर सेलगावाजवळ बसच्या डाव्या बाजूचा टायर फुटला, भयंकर मोठा आवाज झाल्याने भीतीच वातावरण होतं. चालकाने तात्काळ बस कडेला थांबवली. खाली उतरुन पाहिलं तर टायरमधून चिंगारी निघाली होती. डोळ्यांसमोर मृत्यू दिसत होता, पण मनात एकच विचार होता, माझ्या गाडीतील एकही जीव जाता कामा नये!" ही आपबिती सांगितली चिंतामणी ट्रॅव्हल्सचे चालक भीमराव घोडे यांनी.
सोमवारी रात्री ८ वाजता पुण्याहून यवतमाळकडे निघालेली ही ट्रॅव्हल्स (MH 29 AW 4444) मंगळवारी पहाटे ३ च्या सुमारास छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावर बदनापूरजवळील सेलगाव येथे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. पण, भीमराव घोडे आणि सहचालक इर्शाद शेख यांच्या प्रसंगावधानामुळे आज २७ प्रवाशांचा जीव वाचला. त्यामुळे चालकाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे.
२० मिनिटांचा तो 'डेथ वॉच'
रात्री २:३० वाजता शेकटा येथे चहा-पानासाठी बस थांबली होती. २० मिनिटांच्या ब्रेकनंतर बस पुढे प्रवासाला निघाली. कुणी झोपण्याच्या तयारीत होतं, तर कुणी स्वप्नांच्या दुनियेत होतं. २० मिनिटांतच बस सेलगावजवळ आली आणि अचानक बसचं डाव्या बाजूचं टायर फुटलं. घर्षणामुळे आगीच्या ठिणग्या उडाल्या आणि टायरने पेट घेतला.
advertisement
आम्ही ओरडलो, आपत्कालीन दरवाजे उघडले!
चालक भीमराव घोडे सांगतात, "टायर पेटल्याचं दिसताच मी आणि इर्शाद बसमध्ये धावलो. प्रवाशांना ओरडून सावध केलं. काही प्रवासी गाढ झोपेत होते, त्यांना अक्षरशः हलवून उठवलं. क्षणाचाही विलंब न लावता आपत्कालीन दरवाजे उघडले. लोक जीवाच्या आकांताने खाली उतरत होते. सर्व २७ प्रवासी सुखरूप खाली उतरले आहेत याची खात्री केल्यावरच आम्ही बाजूला झालो. प्रवाशांचं साहित्य देखील पटापट बाहेर काढायला सुरुवात केली. सगळे प्रवासी सुखरुप बाहेर उतरले, सगळ्यांनी डोळ्यादेखत बस जळून खाक होताना पाहिली, काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना कोणीच विसरु शकणार नाही. बसचा केवळ सांगाडाच शिल्लक राहिला होता.
advertisement
डोळ्यांसमोर खाक झालं सर्वस्व!
प्रवासी खाली उतरले आणि पुढच्या काहीच मिनिटांत आगीने रौद्ररूप धारण केलं. प्रवाशांच्या डोळ्यांसमोर त्यांचं सामान, स्वप्नं आणि प्रवासाचं साधन जळून खाक होत होतं. अंधाऱ्या रात्री त्या आगीच्या ज्वाळांमध्ये बसचा केवळ सांगाडा उरला. महिनाभरातील ही दुसरी घटना असल्याने महामार्गावरील प्रवासाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Location :
Jalna,Jalna,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 8:10 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'...अन् डोळ्यासमोर जळून बस खाक झाली', पहाटे 3 वाजता 27 प्रवासी कसे वाचले प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार








