Loan Waiver: समिती नेमतो, बच्चू कडू यांना सरकारचं आश्वासन, पण कर्जमाफीच्या समितीवर काँग्रेसचा आक्षेप
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Farmer Loan Waiver: कर्जमाफीचे आश्वासन देताना म्हणजेच निवडणूक काळात भाजपाने समिती स्थापन करण्याची भाषा केली नव्हती, अशी आठवण काँग्रेसने करून दिली आहे.
मुंबई: शेतकरी कर्जमाफीसाठी उपोषणाला बसलेल्या बच्चू कडू यांना समिती नेमून पुढील निर्णय घेऊ, असे सरकारच्या वतीने आश्वासन देण्यात आले आहे. परंतु काँग्रेसने सरकारच्या समिती नेमण्याच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे.
समिती वगैरे नको, सरसकट कर्जमाफीची घोषणा करा
राज्यातील शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडला असून त्याला मदतीची नितांत गरज आहे. शेतकरी कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे. देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होतात हे लाजीरवाणे आहे. भाजपचे नेते व सरकारमधील मंत्री मात्र शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी वाह्यात बडबड करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. शेतकरी हा गरीब व गरजू असून सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केली आहे.
advertisement
कर्जमाफीचे आश्वासन देताना समिती नेमू असे सांगितले होते काय?
शेतकरी कर्जमाफीवर बोलताना नाना पटोले यांनी भाजपा युती सरकार व भाजपा नेत्यांचा समाचार घेतला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे एक विधान करून शेतकऱ्यांचा अपमानच केला आहे. कर्जमाफीचे आश्वासन देताना भाजपाने समिती स्थापन करण्याची भाषा केली नव्हती. शेतकरी हा गरजूच आहे, कसलाही भेदभाव न करता त्याला कर्जमाफी दिली पाहिजे, असे पटोले म्हणाले.
advertisement
सरकार उद्योगपतींसाठी सर्व नियम बदलते मग शेतकऱ्यांवेळी काय होते?
भाजप युती सरकार उद्योगपतींसाठी सर्व नियम बदलते, त्यांना सुविधा दिल्या जातात तर मग शेतकऱ्यांसाठीच नियम आणि अटी कशाला लावता? भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे, भाजपाच्या धोरणामुळेच शेतकरी पिचला आहे. निवडणुकीवेळी कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले पण आता मात्र कर्जमाफी देण्यावरून सत्ताधारी पक्षातील नेते पळ काढत आहेत, असे पटोले म्हणाले.
advertisement
आम्ही कोणत्याही अटी शर्थी लावल्या नव्हत्या, भाजप शेतकरीविरोधी
काँग्रेस प्रणित युपीए सरकार असताना डॉ. मनमोहनसिंह यांनी ऐतिहासिक अशी ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली होती. महाविकास आघाडी सरकारनेही कोणत्याही नियम, अटी न घालता सरसकट कर्जमाफी दिली होती. शेतकऱ्याच्या पाठिशी उभे राहण्याची दानत काँग्रेस सरकारने नेहमीच दाखवली आहे परंतु भाजप मात्र शेतकरीविरोधी आहे. मेघा इंजिनिअरिंग कंपनीला ३ हजार कोटी रुपयांचे वाढीव कंत्राट देताना सरकारकडे पैसे असतात पण शेतकऱ्यांना देण्यासाठी मात्र नसतात. शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्याला कर्जाच्या जोखडातून मुक्त करावे, असेही नाना पटोले म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 14, 2025 5:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Loan Waiver: समिती नेमतो, बच्चू कडू यांना सरकारचं आश्वासन, पण कर्जमाफीच्या समितीवर काँग्रेसचा आक्षेप