मनोज जरांगे मुंबईत का आले? एकनाथ शिंदेंना विचारा, राज ठाकरेंच्या टीकेवर भाईंचं उत्तर
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला शिंदे यांचे पाठबळ असून फडणवीस सरकारला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहात, या विरोधकांच्या थेट आरोपावर शिंदे यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले.
मुंबई : मराठा आरक्षण प्रश्न सोडविताना राज्य सरकारची तारांबळ उडालेली असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांचे प्रश्न सोडविलेले असताना ते पुन्हा मुंबईत का आले हे त्यांनाच विचारा, अशी टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे.
एकनाथ शिंदे हे गणेशोत्सवाला मूळ गावी दरे गावात गेले होते. मुंबईला निघण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला शिंदे यांचे पाठबळ असून फडणवीस सरकारला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहात, या विरोधकांच्या थेट आरोपावर शिंदे यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले. तसेच राज ठाकरे यांच्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले.
advertisement
राज ठाकरेंच्या टीकेवर भाईंचं उत्तर
राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबद्दलची पूर्ण माहिती घेतली पाहिजे होती. आम्ही आधी दिलेले आरक्षण कोणामुळे गेले याबाबतची माहिती त्यांनी घ्यायला हवी होती. हायकोर्टामध्ये आम्ही टिकवलेले आरक्षण विरोधक सुप्रीम कोर्टात का टिकवू शकले नाहीत? असे राज ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना विचारायला हवे होते. शिंदे कमिटी गठित करून अनेक पुरावे शोधून कुणबी नोंदींचे प्रमाणपत्र वाटप केले. आम्ही जे दहा टक्के आरक्षण दिले, त्याचा लाभ मराठा समाज घेतोय, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
advertisement
मुख्यमंत्री फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही जरांगे पाटील यांना मदत करताय का?
मुख्यमंत्री फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही जरांगे पाटील यांना मदत करताय का? या प्रश्नावर एकनाथ शिंदे स्पष्टपणे म्हणाले, मी सगळे खुलेआम करतो. लपून छपून, बंद दाराआड काही करत नाही. राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सर्वजण ताकदीने मराठा आरक्षण प्रश्नाला सामोरे जाऊ. सरकार म्हणून आम्ही योग्य निर्णय घेऊ. काहीबाही आरोप करून विरोधक संभ्रम निर्माण करीत आहेत. विरोधक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्य सरकार योग्य निर्णय घेण्यास समर्थ आहे, असे शिंदे म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 31, 2025 7:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मनोज जरांगे मुंबईत का आले? एकनाथ शिंदेंना विचारा, राज ठाकरेंच्या टीकेवर भाईंचं उत्तर