शाळेच्या बाथरुमला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा नाल्यात बुडून मृत्यू, जळगावातील घटना
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Jalgaon News: भडगावात दोन बालकांच्या मृत्यूनंतर नागरिकांनी रास्ता रोको केला. शिक्षक आणि शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप करीत नागरिकांनी शहर जाम केले.
विजय वाघमारे, प्रतिनिधी, जळगाव: जळगावच्या भडगाव शहरातील आदर्श कन्या विद्यालयातील इंग्लिश मीडियम नर्सरीत शिकणारे चार वर्षीय ज्ञानेश्वर मयंक वाघ आणि अंश सागर तहसीलदार या दोन चिमुकल्यांचा नाल्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पुराच्या पाण्यामुळे शाळेच्या परिसराला संरक्षण देणारी भिंत कोसळली होती. याच नाल्याजवळ विद्यार्थ्यांची बाथरूम असल्याने तेथे गेलेल्या दोन्ही चिमुकल्यांचा पाय घसरून नाल्यात पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांसह नागरिकांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. यामुळे दुतर्फा वाहतूक खोडमली आहे. शाळेच्या परिसरालगत असलेल्या नाल्याजवळ संरक्षण भिंत तुटलेली असल्यामुळे बालकांचा पाय घसरून ते नाल्यात पडल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तसेच शाळेतील शिक्षक व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
advertisement
घटनेनंतर दोघांना तातडीने भडगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर पालकांनी काळीज चिरणारा आक्रोश केला. दरम्यान, दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाकडून संतप्त नातेवाईक आणि नागरिकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
view commentsLocation :
Jalgaon,Maharashtra
First Published :
December 16, 2025 9:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शाळेच्या बाथरुमला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा नाल्यात बुडून मृत्यू, जळगावातील घटना









