लोकसभेला कशामुळे पराभव झाला? सततचा प्रश्न, दानवे म्हणाले-माझ्या मुलानेही काम केले नाही, असे मी म्हणू?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Raosaheb Danve : जालना लोकसभा निवडणुकीत कोणत्या कारणांमुळे तुमचा पराभव झाला? असे रावसाहेब दानवे यांना पत्रकारांनी विचारले.
जालना : लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी टिपेला पोहोचलेले मराठा आरक्षणाचे आंदोलन, राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे आणि त्यामुळे भाजपला बसलेला मोठा फटका अशा विविध कारणांनी अनेक दिग्गजांना सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत पराभव पाहावा लागला. जालन्यातून सलग पाच वेळा निवडून आलेले आणि मोदी सरकारमध्ये रेल्वे राज्यमंत्रिपद भूषविलेल्या रावसाहेब दानवे यांच्या पदरीही पराभव आला. अनेकांच्या विजयी कारणांबरोबर रावसाहेब दानवे यांच्या पराभवाच्या कारणांची राज्यात मोठी चर्चा आहे. यावरच त्यांनी मंगळवारी भाष्य केले.
लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या आमदारांनी काम न केल्याने पराभव झाल्याचे अनेक पराभूत मंडळी सांगत आहेत. तुमच्या बाबतीत देखील अशी नावे समोर आली. काही नेत्यांनी काम न केल्याची कबुली देखील दिली. तुम्हाला तुमच्या पराभवाची कोणती कारणे वाटतात? असे रावसाहेब दानवे यांना पत्रकारांनी विचारले.
advertisement
माझ्या मुलाच्या मतदारसंघातही मला मताधिक्य नाही!
त्यावर बोलताना दानवे म्हणाले, "काही निवडणुकांत जनतेचा कौल हा ठरलेला असतो. जनमत एकदा ठरले तर कुणीही काही करू शकत नाही. माझा पराभव जनमतामुळे झाला असे मी मानतो. पराभवाची कारणे देताना अनेक जण अमुक-तमुकाने काम केले नाही म्हणून पराभव झाल्याचे सांगतात. आता माझ्या मुलाच्या (संतोष दानवे) मतदारसंघात मला लीड मिळाले नाही. मग काय त्याने माझे काम केले नाही, असे मी म्हणू का?"
advertisement
लोकसभा निवडणुकांच्या आधी राज्यातील राजकीय वातावरणात मोठा बदल झाला. या वातावरणाचा मोठा फटका सत्ताधारी पक्षाला बसला, असे सांगत रावसाहेब दानवे यांनी पराभवाची कारणमिमांसा करताना कुणाही नेत्याला दोषी ठरवणे टाळले.
जालन्यात कल्याण काळे यांचा ऐतिहासिक विजय, दानवे पराभूत
गेल्या वर्षभरापासून राज्यातील मराठा आंदोलनाने पुन्हा पेट घेतला. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मोठे आंदोलन उभे राहिले. विशेषत: मराठवाड्यात त्यांच्या आंदोलनाचा मोठा प्रभाव जाणवला. जालना, बीड, संभाजीनगर, परभणी, धाराशिव जिल्ह्यांतील निवडणूक आरक्षणकेंद्री झाली होती. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागले. दरम्यानच्या काळात शासनाने मराठा आरक्षण आंदोलन हाताळण्यात अनेक चुका केल्याचे बोलले गेले. तसेच जालन्यातून सलग पाचवेळा निवडून आल्याने अँटी इन्कमबन्सी देखील दानवे यांच्याविरोधात होती. त्यामुळे जनमत विरोधात गेल्याने रावसाहेब दानवे यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर यांच्या अदृश्य हाताचा फायदा काँग्रेसच्या कल्याण काळे यांना मिळाला. तसेच राज्यातील वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूचे असल्याने जालन्यातून काळे यांनी लोकसभेत पाऊल ठेवले.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
September 03, 2024 5:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
लोकसभेला कशामुळे पराभव झाला? सततचा प्रश्न, दानवे म्हणाले-माझ्या मुलानेही काम केले नाही, असे मी म्हणू?