शक्तिपीठ महामार्गाबाबत मोठी अपडेट! आराखडा बदलणार, 'या' नवीन जिल्ह्याचा समावेश होणार, अंतर किती वाढणार?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Shaktipeeth Mahamarg New Update : राज्यातील महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाबाबत नवा आराखडा निवडणुकांनंतर जाहीर केला जाईल, असे संकेत यापूर्वी महाराष्ट्र राज्य महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते.
सांगली : राज्यातील महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाबाबत नवा आराखडा निवडणुकांनंतर जाहीर केला जाईल, असे संकेत यापूर्वी महाराष्ट्र राज्य महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुका पार पडूनही अद्याप नव्या संरेखनाचा तपशील समोर आलेला नाही. त्यामुळे या महामार्गाच्या मार्गावर येणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता कायम आहे.
निवडणुकीपूर्वी घोषणा, पण आराखडा अजूनही गुलदस्त्यात
शक्तिपीठ महामार्गाला सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे. जमीन अधिग्रहण, पुनर्वसन आणि उपजीविकेच्या प्रश्नांमुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी होती. ही नाराजी निवडणुकांवर परिणाम करू नये, यासाठी नगरपालिकांच्या निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी महामार्गाच्या संरेखनात बदल करण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात नवा आराखडा अद्याप जाहीर झालेला नाही.
भूसंपादन अधिसूचना रद्द
विधानसभा, नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा रोष टाळण्यासाठी शासनाने भूसंपादनाची अधिसूचना रद्द केली. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य महामार्ग प्राधिकरणाने पर्यावरणविषयक परवानगीसाठी सादर केलेला प्रस्तावही मागे घेतला. नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात सरकारकडून ही माहिती देण्यात आली होती. मात्र, महामार्गाचा नेमका नवा मार्ग कसा असेल, याबाबत कोणताही स्पष्ट तपशील देण्यात आलेला नाही.
advertisement
नव्या संरेखनात कोणत्या जिल्ह्याचा समावेश?
अनधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नव्या संरेखनात सातारा जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे वर्धा ते पात्रादेवी या शक्तिपीठ महामार्गाची एकूण लांबी सुमारे ८०२ किलोमीटरवरून ८४० किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः सोलापूरपासून पुढे सुमारे २८० किलोमीटरच्या टप्प्यात मोठे बदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
जिल्हे कायम, काही तालुक्यांत बदल
महत्त्वाचे म्हणजे, आराखडा बदलला असला तरी पूर्वी प्रस्तावित असलेले सर्व जिल्हे महामार्गात कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र काही तालुक्यांमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे काही भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता असली, तरी संपूर्ण चित्र स्पष्ट होईपर्यंत अनिश्चितता कायम राहणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 20, 2026 9:14 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शक्तिपीठ महामार्गाबाबत मोठी अपडेट! आराखडा बदलणार, 'या' नवीन जिल्ह्याचा समावेश होणार, अंतर किती वाढणार?









