पांडुरंगाचा तो 'अखेरचा' निरोप; दर्शन घेऊन परतणाऱ्या मुंबईच्या भाविकांना वाटेतच काळानं गाठलं
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Solapur News: मुंबई येथे राहत असलेले भाविक पंढरपूर व अक्कलकोट येथील देवदर्शनासाठी आले होते. या अपघातामध्ये 3 महिला व 15 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.
सोलापूर - विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन विठ्ठलाचा जयघोष करत क्रुझरमध्ये बसून निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. पंढरपूर-मंगळवेढा मार्गावरील शरद नगर येथे क्रुझर आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात चार भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथे राहत असलेले भाविक पंढरपूर व अक्कलकोट येथील देवदर्शनासाठी आले होते. विठ्ठल-रुक्माईचे दर्शन घेऊन सोलापूरहून रेल्वेने जाण्यासाठी निघाले असताना मंगळवेढा-पंढरपूर मार्गावरील शरद नगर येथे ट्रक (क्रमांक MH46 BU 6651) जीप (क्रमांक MH 13 BN 7687) या वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की जीप पलटी झाली. या अपघातामध्ये चार भाविकांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
advertisement
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी व स्थानिक नागरिकांनी जखमींना बाहेर काढून मंगळवेढ्यातील खाजगी रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल केले. या अपघातामध्ये 3 महिला व 15 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चौघांवर मंगळवेढ्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघेजण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी सोलापूरला पाठवण्यात आले आहे.
advertisement
दरम्यान, अपघात एवढा भीषण होता की मृतदेहांची ओळख पटवणेही अवघड झाले होते. मृत हे मुंबई येथील रहिवासी असून नातेवाईकांना पोलिसांनी कल्पना दिली आहे. ट्रक आणि क्रुझरचा अपघात झाल्याने पंढरपूर मंगळवेढा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोकाकुलता पसरली असून त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 9:19 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
पांडुरंगाचा तो 'अखेरचा' निरोप; दर्शन घेऊन परतणाऱ्या मुंबईच्या भाविकांना वाटेतच काळानं गाठलं










