BMTC च्या ६३१ कर्मचाऱ्यांना ४१ वर्षांनंतर नुकसान भरपाई म्हणून १०-१० लाख मिळणार, काय आहे प्रकरण?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
BMTC Employees: बीएमटीसी बस सेवा १९८४ मध्ये बंद झाल्यानंतर सेवेतील कर्मचारी बेदखल झाले होते. पुढे काय असा यक्ष प्रश्न त्यांना पडला होता.
मुंबई : सिडकोच्या अखत्यारीत येणाऱ्या बॉम्बे मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (बीएमटीसी) च्या ६३१ कर्मचाऱ्यांना तब्बल ४१ वर्षांनी न्याय मिळणार आहे. बीएमटीसी बस सेवा १९८४ मध्ये बंद झाल्यानंतर सेवेतील कर्मचारी बेदखल झाले होते. पुढे काय असा यक्ष प्रश्न त्यांना पडला होता. परंतु दरम्यानच्या काळात आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्याचे काम काही जण करीत राहिले.
पीडितांना न्याय आणि आर्थिक भरपाई मिळावी यासाठी कर्मचारी आणि विविध संघटना गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत असताना भाजप आमदार विक्रांत पाटील गेल्या काही काळापासून नगरविकास विभागापासून मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत फेऱ्या मारत आहेत. अखेर आमदार विक्रांत पाटील यांना माजी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यात यश मिळाले आहे.
बीएमटीसीच्या तब्बल ४१ वर्षांनंतर ६३१ कर्मचाऱ्यांना लवकरच प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत मिळेल. कामगारांच्या लढ्याबाबत आमदार विक्रांत पाटील म्हणाले की, बीएमटीसीमध्ये अनेक वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होतो. सिडको आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाचा पाठपुरावा केला आणि विशेष बैठकींद्वारे यावर चर्चा देखील केली. ज्या कर्मचाऱ्यांना आधीच पीएफ आणि ग्रॅच्युइटी मिळाली आहे त्यांना प्रथम सिडकोमार्फत १० लाख रुपयांचे धनादेश दिले जातील, त्यानंतर उर्वरित कर्मचाऱ्यांनाही भरपाई देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 13, 2025 7:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMTC च्या ६३१ कर्मचाऱ्यांना ४१ वर्षांनंतर नुकसान भरपाई म्हणून १०-१० लाख मिळणार, काय आहे प्रकरण?