Kalyan News : 'दिवाळी तोंडावर आणि चेक वटेना'! कल्याण-डोंबिवलीत आर्थिक व्यवहार ठप्प; सणासुदीत नागरिकांचे हाल
Last Updated:
Cheque Clearance Problem In KDMC : दिवाळीच्या तोंडावर कल्याण-डोंबिवली परिसरातील बँकांमध्ये चेक वटण्यास विलंब होत असल्याने नागरिक आणि व्यापारी वर्ग चिंतेत आहेत. तांत्रिक अडथळ्यांमुळे बँक व्यवहार विस्कळीत झाले असून ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
कल्याण : दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचला असताना नागरिक आणि व्यापारी वर्गाला बँक व्यवहारातील विलंबामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. डोंबिवली आणि कल्याण परिसरातील अनेक सहकारी, राष्ट्रीयकृत आणि कॉर्पोरेट बँकांमध्ये गेल्या सात-आठ दिवसांपूर्वी जमा केलेले चेक अद्याप वटले नसल्याने नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
व्यवसायिकांचे व्यवहार ठप्प, आर्थिक नियोजनावर परिणाम
दिवाळीच्या काळात सोने, चांदी, नाणी, दागिने आणि शेअर्सची खरेदी वाढते. दोन लाखांपेक्षा जास्त किमतीच्या व्यवहारासाठी ऑनलाईन भरणा बंधनकारक असल्याने नागरिकांनी आधीच तयारी म्हणून बँकांमध्ये निधी उपलब्ध ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु, धनादेश वटण्यास विलंब होत असल्याने त्यांची आर्थिक नियोजनाची गणिते कोलमडली आहेत.
काही व्यावसायिक दररोज कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करतात. त्यांना ऑनलाईन पेमेंटसाठी खात्यात पुरेशी रक्कम असणे आवश्यक असते. त्यामुळे अनेकांनी गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर धनादेश जमा केले होते. मात्र, सात दिवस उलटूनही हे धनादेश वटले नाहीत यामुळे त्यांच्या घाऊक व्यापारावर परिणाम होत आहे. उलट बँकांकडून ग्राहकांना सतत युपीआय, आरटीजीएस, एनईएफटी, नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगसारख्या ऑनलाईन माध्यमांचा वापर करण्याचे संदेश पाठवले जात आहेत. या वारंवार येणाऱ्या संदेशांमुळे ग्राहक अधिकच त्रस्त झाले आहेत.
advertisement
रिझर्व्ह बँकेने काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते की बँकेत जमा केलेला धनादेश त्याच दिवशी काही तासांत वटवला जाईल. मात्र, प्रत्यक्षात तसे होत नसल्याने ग्राहक नाराज आहेत. कल्याण आणि डोंबिवलीतील काही बँकांमध्ये या कारणावरून कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये वादाचे प्रसंगही घडत आहेत.
स्थानिक बँक अधिकाऱ्यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार धनादेश वटणावळीसाठी सुधारित प्रणाली लागू करण्यात आली आहे. या प्रणालीचे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या पेमेंट नेटवर्कसोबत एकात्मीकरण सुरू आहे. या प्रक्रियेत तांत्रिक अडथळे येत असल्याने काही बँकांमध्ये धनादेश वटण्यास विलंब होत आहे. तसेच नवीन प्रणालीविषयी अनेक कर्मचाऱ्यांना पुरेसे प्रशिक्षण नसल्याने कामकाजात अडथळे निर्माण होत आहेत.
advertisement
बँक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर धनादेश वटण्याची समस्या कायमची सुटेल. मात्र, सध्या या संक्रमण काळात ग्राहक आणि बँक कर्मचारी दोघांनाही तणावाचा सामना करावा लागत आहे. दिवाळीसारख्या महत्वाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती बदलण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 12, 2025 10:20 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Kalyan News : 'दिवाळी तोंडावर आणि चेक वटेना'! कल्याण-डोंबिवलीत आर्थिक व्यवहार ठप्प; सणासुदीत नागरिकांचे हाल