लाळ्या खुरकूत आला, पशुधन सांभाळा! 'असं' करा गुरांचं रक्षण
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
असं म्हणतात की, लाळ्या खुरकूत हा गुरांचं आणि शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान करणारा आजार आहे. कारण तो जडल्यास...
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : पावसाळा हा अनेकजणांच्या आवडीचा ऋतू. परंतु पावसाळा सोबत कितीही गारवा घेऊन येत असला, तरी दुखणंही प्रचंड घेऊन येतो. पावसाच्या दिवसांत कणकण, सर्दी, खोकला हे आजार अगदी सामान्य वाटतात आणि पोट बिघडतं ते वेगळंच. पावसाळ्यात केवळ माणसांमध्येच नाही, तर गुरांमध्येही वेगवेगळे आजार डोकं वर काढतात. यात सर्वाधिक आढळणारा आजार म्हणजे लाळ्या खुरकूत. या विषाणूजन्य आजारावर कोणतेही प्रभावी औषधोपचार नाहीत. त्यामुळे वर्षातून 2 वेळा लसीकरण हाच प्रतिबंधात्मक उपाय आहे.
advertisement
अनेकदा शेतकरी गुरांच्या लसीकरणाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आजार झाल्यानंतर गुरांमध्ये त्याची लक्षणं दिसून येतात. काहीवेळा त्या आजारांवर उपचार करणंही शक्य होत नाही. त्यामुळे आधीच काळजी घेतलेली बरी. आज आपण लाळ्या खुरकूत हा आजार नेमका काय आहे, त्याची लक्षणं काय आहेत, त्यापासून आपल्या गुरांचं रक्षण कसं करावं, याबाबत जाणून घेऊया. पशुवैद्यकीय अधिकारी कपिल पंडित यांनी ही माहिती दिलीये.
advertisement
असं म्हणतात की, लाळ्या खुरकूत हा गुरांचं आणि शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान करणारा आजार आहे. कारण तो जडल्यास गुरांची दूध देण्याची क्षमता मंदावते, त्यांची वाढ खुंटते, काम करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत वर्षातून 2 वेळा गुरांचं लसीकरण केलं जातं. प्रत्येक शेतकऱ्यानं हे लसीकरण करून घ्यायला हवं. कारण या आजारावर हाच एकमेव प्रतिबंधात्मक उपाय आहे.
advertisement
लाळ्या खुरकूत झालाय हे कसं कळतं?
हा आजार झाल्यास गुरांच्या तोंडात फोड येतात, त्यांच्या तोंडातून लाळ येण्यास सुरूवात होते. त्यांच्या खुरांमध्येही फोड येतात, त्यांना अचानक ताप भरतो, ते चारा खात नाहीत, इत्यादी या आजाराची प्रमुख लक्षणं आहेत.
advertisement
गुरांना हा आजार झाल्यास त्यांची रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे त्यांना व्हिटॅमिन्सची औषधं द्यायला हवी. त्याचबरोबर त्यांच्या तोंडातल्या आणि खुरांमधल्या जखमा निर्जंतुकीकरणानं स्वच्छ करणं गरजेचं असतं. तसंच गुरांच्या शरिरावरील जखमांना अँटीसेप्टिक क्रीम लावावं. त्यामुळे त्या लवकर बऱ्या होण्यास मदत मिळते. अशाप्रकारे शेतकऱ्यांनी लाळ्या खुरकूत या गंभीर आजारापासून आपल्या गुरांचं रक्षण करावं, असं आवाहन जालन्यातील पशुवैद्यकीय अधिकारी कपिल पंडित यांनी केलं आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
July 02, 2024 5:36 PM IST