मीरा रोडवर कार्यकर्त्यांचा राडा, पोलिसांकडून धरपकड; अविनाश जाधवांच्या अटकेनंतर मनसेने काढली सरकारची खरडपट्टी!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
MNS Mira bhayandar Morcha : मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पहाटे साडेतीन वाजता अटक केल्यानंतर आता मनसेने ट्विट करत सरकारला धारेवर धरलं. पोलिसांनी जमावबंदी केल्यानंतर देखील मनसेने भूमिका ठाम ठेवली आहे.
MNS Marathi Morcha in Mira bhayandar : मराठी भाषेच्या आणि मराठी माणसाच्या हक्कांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आज मीरा-भाईंदरमध्ये भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. मराठीच्या मुद्द्यावर मनसेने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतल्याचे या मोर्चातून दिसून आलं आहे. मीरा-भाईंदर शहरातील विविध भागातून मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होणार होते. परंतू पोलिसांनी परवानगी न दिल्याने आणि अविनाश जाधव यांच्या अटकेनंतर आता मनसे कार्यकर्त्यांनी मीरा रोड परिसरात राडा घातल्याचं पहायला मिळालं. पोलिसांनी जमावबंदी केल्यानंतर देखील मनसेने भूमिका ठाम ठेवली आहे. त्यामुळे पोलिसांची मोठी कोंडी झाल्याचं पहायला मिळतंय.
मनसेचं ट्विट
अशातच आता अविनाश जाधव यांना पहाटे साडेतीन वाजता अटक केल्यानंतर आता मनसेने ट्विट करत सरकारला धारेवर धरलं. मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा आयोजित केलेला असताना, पहाटे पोलीस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाईच्या नावाखाली पक्षाचे नेते अविनाश जाधव यांना अटक केली. सरकार मराठीच्या मुद्द्यावर निघणाऱ्या मोर्च्याला इतकी का घाबरत आहे? का हे लांगुलचालन आहे? असा सवाल मनसेने ट्विट करत विचारला आहे.
advertisement
सरकार महाराष्ट्राचं आहे का गुजरातचं?
तसेच महाराष्ट्रात मराठी माणसाच्या मोर्च्याला परवानगी नाही. हे सरकार महाराष्ट्राचं आहे का गुजरातचं? आमच्या नेत्यांना अटक करून मोर्चा थांबेल आणि विषय मागे पडेल असं सरकारला वाटत असेल तर त्यांनी त्या भ्रमात राहू नये. मराठी माणूसच आता या मोर्च्याचे नेतृत्व करेल, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
advertisement
फडणवीस म्हणतात...
राज्यात मनसेच काय इतर कोणलाही मोर्चा काढायला परवानगी आहे. पण मोर्चा इथेच काढायचा आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तर ते योग्य ठरणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तुम्ही सभा घ्या पण त्यांना स्पेसिफिक अशा ठिकाणीच तो मोर्चा न्यायचा होता की ज्यातनं काही अडचणी निर्माण झाल्या असत्या आणि कायदा सुव्यवस्थेचा विषय निर्माण झाला असता, असंही फडणवीस म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 08, 2025 11:45 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मीरा रोडवर कार्यकर्त्यांचा राडा, पोलिसांकडून धरपकड; अविनाश जाधवांच्या अटकेनंतर मनसेने काढली सरकारची खरडपट्टी!