Mumbai Local: छठ पूजेला जाणाऱ्या भक्तांनी अडवला मार्ग, मुंबईत लोकलचा खोळंबा, थेट रेल्वेमंत्र्यांकडे ही मागणी
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Local: दरवर्षीप्रमाणे यंदाही छठ पूजेच्या दिवशी हजारो नागरिक पूजा करण्यासाठी खाडीकिनारी जमा झाले. पादचारी पूल नसल्याने भाविकांनी थेट पटरीवरच गर्दी केली.
मुंबई: छठ पूजेनिमित्त डोंबिवलीत भक्तांची प्रचंड गर्दी झाल्याने मुंबई लोकल ट्रेन थांबवावी लागली. ठाकुर्ली परिसरात खाडीकिनारी छठ पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, या ठिकाणी पादचारी पुलाची सुविधा नसल्याने नागरिकांनी थेट रेल्वे पटरी ओलांडून खाडीकडे जाण्याचा मार्ग निवडला. त्यामुळे रेल्वे वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली आणि पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा ताफा पळवावा लागला.
पादचारी पुलाच्या अभावी जीवघेणी कसरत
दरवर्षीप्रमाणे यंदाही छठ पूजेच्या दिवशी हजारो नागरिक पूजा करण्यासाठी खाडीकिनारी जमा झाले. गणेशोत्सव आणि नवरात्रात जसं विसर्जनासाठी नागरिक तलाव किंवा खाडीकडे जातात, तसंच छठ पूजेसाठीही भक्तांनी गर्दी केली. मात्र, ठाकुर्ली परिसरातील पादचारी पुलाच्या अभावामुळे हा प्रवास धोकादायक ठरला. अनेक नागरिक रेल्वे रूळ ओलांडत असल्याचं दृश्य दिसलं.
advertisement
रेल्वे वाहतूक विस्कळीत, पोलिसांची धावपळ
लोहमार्ग पोलिसांनी सांगितलं की, या भागात दरवर्षी अशीच गर्दी होते. त्यामुळे यंदा रेल्वेने “कॉशन ऑर्डर” दिली होती, म्हणजे ट्रेन कमी वेगात चालवण्याचे आदेश होते. तरीही काही ठिकाणी नागरिक रेल्वेमार्गावर उतरल्याने लोकल सेवा काही काळासाठी थांबवावी लागली. या घटनेमुळे प्रवाशांना उशीर सहन करावा लागला, तर पोलिसांनी मोठा ताण झेलला.
advertisement
पादचारी पूल उभारण्यासाठी मागणी
या परिस्थितीवर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून तातडीने त्या ठिकाणी पादचारी पूल उभारण्याची मागणी केली आहे. वाढत्या वस्तीच्या पार्श्वभूमीवर ठाकुर्ली परिसरात रेल्वे आणि महापालिकेने मिळून नागरिकांसाठी सुरक्षित सुविधा निर्माण करावी, अशी अपेक्षा पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
advertisement
ठाणे रेल्वे प्रवासी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी सांगितले की, “गेल्या अनेक वर्षांपासून हजारो लोक रेल्वे रूळ ओलांडतात. रेल्वेला याची माहिती असूनही योग्य उपाययोजना होत नाही. रेल्वे प्रशासन अपघाताची वाट बघत आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सध्या पावसाळा असल्याने रेल्वेमार्ग ओले आणि घसरडे झालेले असतात, त्यामुळे अशा प्रकारे रूळ ओलांडणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि रेल्वे सेवेच्या सुरळीततेसाठी पादचारी पूल उभारण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 29, 2025 9:13 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: छठ पूजेला जाणाऱ्या भक्तांनी अडवला मार्ग, मुंबईत लोकलचा खोळंबा, थेट रेल्वेमंत्र्यांकडे ही मागणी


