Mumbai News: संजय गांधी राष्ट्रीय उद्यान सुरू राहणार की बंद? महत्त्वाचं अपडेट समोर
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai News: दररोज हजारो नागरिक व पर्यटक संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट देत असतात. परंतु, आता दोन दिवस हे उद्यान बंद राहणार आहे.
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान 29 व 30 जानेवारी रोजी सर्वसामान्य नागरिकांसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उद्यान प्रशासनाने दिली आहे.
या कालावधीत सकाळी प्रभात फेरीसाठी येणारे नागरिक, पर्यटक तसेच शाळा-महाविद्यालयांचे शैक्षणिक दौरे यांना उद्यानात प्रवेश दिला जाणार नाही. राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या शासकीय दुखवट्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला असून प्रशासनाकडून सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे उपवनसंरक्षक (दक्षिण) किरण पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 व 30 जानेवारी या दोन दिवसांत उद्यानातील सर्व प्रवेशद्वारे बंद राहतील. यामध्ये बोरीवली, ठाणे आणि येऊर परिसरातील सर्व प्रवेश मार्गांचा समावेश आहे. तसेच कान्हेरी लेणी, वन्यजीव सफारी, बोटिंग, सायकलिंग ट्रॅक, खेळाची मैदाने तसेच इतर पर्यटन व मनोरंजनाशी संबंधित सर्व उपक्रम पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत.
advertisement
दररोज हजारो नागरिक व पर्यटक संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट देत असतात. त्यामुळे अचानक जाहीर करण्यात आलेल्या या बंदमुळे अनेकांच्या नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र शासकीय आदेशाचे पालन करणे आवश्यक असल्याने हा निर्णय अपरिहार्य असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
advertisement
29 व 30 जानेवारीनंतर उद्यान पुन्हा नियमित वेळेनुसार सुरू करण्यात येईल, अशी माहितीही देण्यात आली आहे. नागरिकांनी या काळात उद्यानाला भेट देणे टाळावे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उद्यान प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 29, 2026 7:43 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: संजय गांधी राष्ट्रीय उद्यान सुरू राहणार की बंद? महत्त्वाचं अपडेट समोर










