Thane – Borivali Tunnel: ठाणे ते बोरिवली अवघ्या 12 मिनिटांत! ट्विन टनेलबाबत महत्त्वाची अपडेट
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Thane – Borivali Tunnel: मुंबईतील पश्चिम उपनगरांना थेट ठाणे शहराशी जोडण्यासाठी ठाणे-बोरिवली हा दुहेरी बोगदा महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने आर्थिक मंजुरी दिली आहे.
मुंबई: महानगरी मुंबई आणि ठाण्याची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न सुरू असतात. आता ठाणे – बोरिवली ट्विन टनेल हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला असून या प्रकल्पासाठीच्या निधीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (एमएमआरडीए) हाती घेतलेया या नागरी परिवहन योजनेमुळे ठाणे ते बोरिवली प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. सध्या या दोन ठिकाणांदरम्यानच्या प्रवासासाठी गाडीने दीडे ते दोन तास लागतात. मात्र, बोगदा पूर्ण झाल्यानंतर हे अंतर अवघ्या 12 मिनिटांत पार करता येणार आहे.
300 कोटींचा निधी
मुंबईतील पश्चिम उपनगरांना थेट ठाणे शहराशी जोडण्यासाठी ठाणे-बोरिवली हा दुहेरी बोगदा महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने आर्थिक मंजुरी दिली असून ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह या दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी 300 कोटींचा निधी एमएमआरडीएला मिळाला आहे. यातील 210 कोटी रुपये हे दुहेरी बोगद्यासाठी असतील, तर उर्वरित मरीन ड्राइव्ह प्रकल्पसाठी 90 कोटी रुपये असतील. या मोठ्या निधीमुळे कामाला वेग येणार आहे.
advertisement
कसा असेल मार्ग?
सध्या ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाची निर्मिती केली जात आहे. हा भुयारी रस्ता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार असून त्याची एकूण लांबी 11.85 किलोमीटर असेल. यातील 10.25 किमीचे अंतर हे भुयारी बोगद्याद्वारे पार करण्यात येईल. भुयारी मार्गात दोन मुख्य मार्गिका असतील. परंतु, आपत्कालिन परिस्थितीसाठी एक स्वतंत्र मार्गिका ठेवण्यात येईल. त्यामुळे वाहतूक सुरक्षित होईल आणि आपत्कालिन परिस्थितीत तातडीची मदत मिळेल. या प्रकल्पासाठी तब्बल 18 हजार 838 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून नागरी परिवहनसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
advertisement
दीड तासांचा प्रवास 12 मिनिटांत
दुहेरी बोगद्यामुळे ठाणे ते बोरिवली हे दीड ते दोन तासांचे अंतर सुमारे 12 मिनिटांत पार करता येईल. भुयारी मार्गात सिग्नल नसल्याने वाहनांना विनाअडथळा प्रवास करणे शक्य होईल. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी निधी दिला असून हा प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि ठाण्यातील वाढती लोकसंख्या व वाहतुकीचा ताण लक्षात घेता हा प्रकल्प नागरी वाहतुकीतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे.
advertisement
घोडबंदर रोडवरील गर्दी कमी
सध्या ठाणे ते बोरिवली दरम्यान प्रवास करणाऱ्यांना घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावर देखील या वाहतुकीचा ताण जाणवतो. ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा सुरू झाल्यानंतर या दोन्ही महामार्गांवरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल, तसेच वाहन चालकांची इंधन बचत देखील होईल. विशेष म्हणजे या भुयारी मार्गामुळे परिसरातील विकासाला देखील चालना मिळेल.
advertisement
दरम्यान, ठाणे आणि मुंबईकरांसाठी महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या या प्रकल्पाला राज्य सरकारकडून निधीची पहिली मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून निधीअभावी प्रलंबित असणाऱ्या या प्रकल्पाच्या कामाला वेग येणार असून ठाणे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
October 04, 2025 8:33 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Thane – Borivali Tunnel: ठाणे ते बोरिवली अवघ्या 12 मिनिटांत! ट्विन टनेलबाबत महत्त्वाची अपडेट