ठार मारण्याची धमकी, कुटुंबाचे स्थलांतर, दहशतवाद्यांशी नडला हा अधिकारी; 30 वर्षांच्या संघर्षानंतर उभा राहिला जगातला उंच चिनाब ब्रिज
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Chenab Rail Bridge: काश्मीरमधील चिनाब नदीवर उभारलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. निसार अहमद मीर यांच्या 30 वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे हा प्रकल्प यशस्वी झाला.
काश्मीर: जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचा उद्घाटन नुकतंच पार पडलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे लोकार्पण केले. कश्मीरमधील चिनाब नदीवर उभारलेला हा भव्य पुल काश्मीरवासीयांसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरला आहे. पाकिस्तानच्या सीमेजवळ उभारलेला हा पुल भारतासाठी धोरणात्मक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, त्यामुळे काश्मीरचा देशाच्या मुख्य भागाशी रेल्वेमार्गे थेट संपर्क प्रस्थापित होणार आहे. परिणामी काश्मीरमधील व्यापार आणि पर्यटनात मोठी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
30 वर्षांची झुंज - निसार अहमद मीर यांची प्रेरणादायी कथा
या ऐतिहासिक प्रकल्पामध्ये विशेष योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एक म्हणजे निसार अहमद मीर. गेली 30 वर्षे त्यांनी या प्रकल्पासाठी झगडत राहिले. 1996 मध्ये रेल्वेची परीक्षा पास केल्यानंतर निसार मीर यांची या कश्मीर रेल्वे प्रकल्पावर नियुक्ती झाली. तेव्हापासून ते सेक्शन ऑफिसर म्हणून कार्यरत राहिले. त्यांचं मुख्य काम रेल्वेसाठी जमीन उपलब्ध करून देण्याचं होतं. मात्र हे काम करताना त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं.
advertisement
विरोध, मारहाण आणि दहशतवाद्यांच्या धमक्या
जमिनीच्या मुद्द्यावर निसार मीर यांना अनेकदा स्थानिक लोकांचा तीव्र विरोध झेलावा लागला. काही वेळा तर त्यांच्यावर थेट हल्लेही झाले. इतकंच नाही तर दहशतवाद्यांकडूनही त्यांना धमक्या मिळाल्या होत्या. या धमक्यांमुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्य घाबरून गेले आणि अखेर त्यांनी कुटुंबाला दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केलं. दहशतवाद्यांनी निसार मीर यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला होता की- जर त्यांनी हा प्रकल्प सोडला नाही,तर त्यांना ठार मारलं जाईल.
advertisement
स्वप्न साकार झालं
या सर्व अडथळ्यांना तोंड देत निसार मीर यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिलं. त्यांनी न डगमगता काम सुरूच ठेवलं आणि आज जेव्हा हा भव्य प्रकल्प पूर्णत्वास पोहोचला तेव्हा सर्वात जास्त समाधान आणि अभिमान याच अधिकाऱ्याला वाटतो आहे.
काश्मीरसाठी नवा अध्याय
या प्रकल्पाच्या यशस्वी पूर्ततेनंतर काश्मीरला भारताच्या मुख्य भागाशी जोडणारा एक शाश्वत दुवा निर्माण झाला आहे. आर्थिक, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने ही एक ऐतिहासिक पायरी मानली जात आहे. या पुलामार्फत देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून काश्मीरशी थेट रेल्वे संपर्क साधता येणार आहे – हे केवळ तंत्रज्ञानाचं नव्हे, तर जिद्दीचंही उत्तम उदाहरण आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 06, 2025 3:39 PM IST
मराठी बातम्या/देश/
ठार मारण्याची धमकी, कुटुंबाचे स्थलांतर, दहशतवाद्यांशी नडला हा अधिकारी; 30 वर्षांच्या संघर्षानंतर उभा राहिला जगातला उंच चिनाब ब्रिज