Tulsi vivah 2024: तुळशीसोबत श्रीहरी विष्णूने का केला विवाह; तुळशीविवाहाची कथा, धार्मिक महत्त्व पहा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Tulsi vivah 2024: कार्तिक मासातल्या द्वादशीला तुळस आणि शाळीग्राम (विष्णू अवतार) यांचा विवाह केला जातो. तुलसीविवाहानंतर शुभकार्यांच्या मुहूर्तांना सुरुवात होते. तुलसीविवाहाविषयी पौराणिक ग्रंथांमध्ये एक कथा सांगितली गेली आहे.
मुंबई : दिवाळीनंतर महत्त्वाचा सण-उत्सव म्हणजे तुळशी विवाह. मंगळवार 12 नोव्हेंबरला कार्तिक मासातल्या शुक्ल पक्षातील एकादशी आहे. आपण ही तिथी कार्तिकी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी म्हणून साजरी करतो. या तिथीला खास असं महत्त्व आहे. या तिथीपासून तुळशीविवाहाला प्रारंभ होत आहे. प्रबोधिनी एकादशी आणि तुलसीविवाहात ऊसाला विशेष महत्त्व असतं. या दिवशी केल्या जाणाऱ्या पूजाविधीत उसाचा आवर्जून समावेश केला जातो.
कार्तिकी एकादशीला भगवान विष्णू निद्रेतून जागे होतात. त्यामुळे कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी म्हणतात. आषाढ ते कार्तिक या महिन्यांना चातुर्मास असं म्हणतात. या कालावधीत कोणतंही शुभकार्य होत नाही. कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपतो. कार्तिक मासातल्या द्वादशीला तुळस आणि भगवान शाळीग्राम यांचा विवाह केला जातो. तुलसीविवाहानंतर शुभकार्यांच्या मुहूर्तांना सुरुवात होते. तुलसीविवाहाविषयी पौराणिक ग्रंथांमध्ये एक कथा सांगितली गेली आहे.
advertisement
तुळशी विवाह कथा -
वृंदा नावाची एक कन्या होती. समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या जालंदर नावाच्या राक्षसाशी वृंदाचा विवाह झाला. वृंदा ही विष्णुभक्त आणि पतिव्रता स्त्री होती. त्यामुळे तिचा पती जालंदर हा खूप शक्तिशाली झाला होता. देव-देवतादेखील या राक्षसाला पराभूत करू शकत नव्हते. भगवान शंकरांसह देवांनी या राक्षसाचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूंना प्रार्थना केली. भगवान विष्णूंनी जालंदराचा वेष धारण करून वृंदाची पवित्रता नष्ट केली. यामुळे जालंदरची शक्ती नष्ट झाली आणि भगवान शंकरांनी जालंदरचा वध केला.
advertisement
भगवान विष्णूंच्या कपटाची माहिती जेव्हा वृंदाला समजली तेव्हा ती संतापली आणि तिनं विष्णूंना काळा दगड व्हाल (शालिग्राम) असा शाप दिला. वृंदाच्या शापाने भगवान विष्णू आपल्या पत्नीपासून दुरावले. राम अवतारात ते सीतेपासून वेगळे झाले. देवाचं दगडातलं रूप पाहून देव-देवता भयभीत झाले. त्यानंतर लक्ष्मी मातेनं वृंदाला विनंती करून जगाच्या कल्याणासाठी आपला शाप मागे घेण्यास सांगितलं. त्यानंतर वृंदाने शाप मागे घेतला आणि ती जालंदरसोबत सती गेली. तिच्या अस्थीतून एक झाड उगवलं. त्या झाडाला भगवान विष्णूंनी तुळस असं नाव दिलं आणि स्वतः दगडाचं रूप धारण करून सांगितलं, की ‘आजपासून मी तुळशीशिवाय प्रसाद ग्रहण करणार नाही.’ हा दगड शाळिग्राम समजून त्याची तुळशीसोबत पूजा केली जाते.
advertisement
कार्तिक महिन्यात तुळशीचा शाळिग्रामाशी विवाह केला जातो.
प्रबोधिनी एकादशीनंतर सर्व शुभकार्यांना पुन्हा प्रारंभ केला जातो. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्यानंतर त्यांना सूप वाजवून झोपेतून उठवलं जातं. सूप वाजवल्याने घरातलं दारिद्र्य दूर होतं, असं मानलं जातं. ही परंपरा पुरातन काळापासून सुरू आहे. या एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुळस आणि शाळीग्राम यांचा विवाह केला जातो. प्रबोधिनी एकादशीला भगवान विष्णूचं विधिवत पूजन केलं जातं. या एकादशीपासून शेतकरी ऊसतोडणीला प्रारंभ करतात. ऊस कापणीनंतर पहिला ऊस भगवान विष्णूंना नैवेद्य म्हणून दाखवला जातो. त्यानंतर हा उसाचा प्रसाद सर्वांना वाटप केला जातो.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 07, 2024 10:28 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Tulsi vivah 2024: तुळशीसोबत श्रीहरी विष्णूने का केला विवाह; तुळशीविवाहाची कथा, धार्मिक महत्त्व पहा