पृथ्वीच्या आत धकधक! दर 26 सेकंदांनी होतेय हृदयासारखी धडधड, आवाजाचं रहस्य काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
सुमारे 60 वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांना पृथ्वीच्या मध्यभागी एक गूढ आवाज ऐकू आला होता. शास्त्रज्ञांना दर 26 सेकंदांनी पृथ्वीमध्ये एक कंपन आढळलं. जे माणसाच्या हृदयाच्या ठोक्यांसारखं होतं.
नवी दिल्ली : माणसाला जिवंत राहण्यासाठी, त्याचे हृदय सतत धडधडत राहणं महत्त्वाचं आहे. माणसाचं हृदय एका मिनिटात 72 वेळा धडधडतं. तुम्ही छातीवर डाव्या बाजूला जिथं हृदय आहे, तिथं हात ठेवलात आणि नीट ऐकलात तर तुम्हाला हृदयाची धडधड जाणवेल. अशीच माणसाच्या हृदयासारखी धडधड ऐकू येते आहे ती पृथ्वीच्या आतून. दर 26 सेकंदाने पृथ्वीच्या आतून हृदय धडधडल्यासारखा आवाज येतो आहे. हा रहस्यमयी आवाज कसला असा प्रश्न निर्माण झाला आहे.
खरंतर सुमारे 60 वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांना पृथ्वीच्या मध्यभागी एक गूढ आवाज ऐकू आला होता. 1960 च्या दशकाच्या सुरुवातीला शास्त्रज्ञ जॅक ऑलिव्हर यांनी पहिल्यांदाच पृथ्वीवरून येणारा हा आवाज ऐकला. त्यावेळी उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी शोधून काढलं की दर 26 सेकंदांनी पृथ्वीतून एक आवाज येतो, जो मानवी हृदयाच्या ठोक्यासारखा वाटतो.
advertisement
जॅक ऑलिव्हर यांनी केलेल्या संशोधनानुसार, या लाटा दक्षिण किंवा विषुववृत्तीय अटलांटिक महासागरातील कुठूनतरी पृथ्वीवर प्रवेश करतात आणि उत्तर गोलार्धात उन्हाळ्यात त्यांची तीव्रता वाढते.
यानंतर 1980 मध्ये अमेरिकन भूगर्भशास्त्रज्ञ गॅरी होलकोम्ब यांनीदेखील पृथ्वीतून येणारा हा रहस्यमय आवाज ऐकला. 2005 मध्ये कोलोरॅडो विद्यापीठातील संशोधकांनी देखील हा आवाज ऐकला आणि पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्यावरील गिनीच्या आखात म्हणून त्याचं स्रोत ओळखण्यात त्यांना यश आलं.
advertisement
शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की पृथ्वीवरून येणारा हा गूढ आवाज पृथ्वीच्या आत असलेल्या टेक्टोनिक प्लेट्सच्या टक्करमुळे निर्माण होतो किंवा हा आवाज लाटांमुळे देखील येऊ शकतो. दुसरा सिद्धांत सांगतो की तो ज्वालामुखीच्या क्रियाकलापांमुळे देखील असू शकतो. पण पृथ्वीच्या आतून येणारा आवाज प्रत्यक्षात कसला याचं रहस्य अद्याप शास्त्रज्ञांना उलगडलेलं नाही. याच्या निष्कर्षापर्यंत शास्त्रज्ञ अद्याप पोहोचले नाहीत.
advertisement
पृथ्वीच्या आतून दर 26 सेकंदांनी होणारं हे कंपन अगदी सामान्य आहे आणि त्यामुळे कोणताही धोका निर्माण होत नाही. तसंच मानवांनाही ते सहजासहजी जाणवू शकत नाही. या कंपनामागील खरं कारण कळल्यास अनेक गुपितं उलगडू शकतात, असं शास्त्रज्ञांचं मत आहे.
Location :
Delhi
First Published :
June 13, 2025 3:01 PM IST