कृषी हवामान : आजही शेतकऱ्यांवर पावसाचं संकट! या जिल्ह्यांना अलर्ट, पिकांची काय काळजी घ्याल?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Maharashtra Weather Update : भारतीय हवामान खात्याने (IMD) 23 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्रातील हवामानाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट्स जाहीर केले आहेत.
मुंबई : भारतीय हवामान खात्याने (IMD) 23 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्रातील हवामानाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट्स जाहीर केले आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील 24 तासांत राज्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पावसाचा सर्वाधिक प्रभाव कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत जाणवणार असून शेतकऱ्यांसाठीही ही महत्त्वाची सूचना आहे.
हवामानाचा अंदाज
कोकण व मुंबई
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि मुंबई परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईत मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी आज पुन्हा रिमझिम ते मध्यम पावसाच्या सरी पडतील. यामुळे काही भागांत पाणी साचण्याची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भ
नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
मराठवाडा
लातूर, धाराशिव, बीड, नांदेड, हिंगोली आणि परभणी या भागांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडेल.
पश्चिम महाराष्ट्र
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक पावसाच्या सरी अपेक्षित आहेत. सांगली आणि सोलापूरसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे.
उत्तर महाराष्ट्र
अहमदनगर, नाशिक आणि जालना जिल्ह्यांत हलक्या सरींचा अंदाज आहे. या भागात पावसाचा जोर तुलनेने कमी राहील.
advertisement
प्रशासनाचा इशारा
कोकण व विदर्भातील काही भागांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका असल्याने स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नदी-नाल्यांजवळील भागांत नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि आपत्कालीन व्यवस्थेसाठी तयारीत राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन
अतिवृष्टीमुळे खरीप पिकांची मुळे कुजण्याचा व बुरशीजन्य रोगांचा धोका वाढतो. अशावेळी शेतकऱ्यांनी खालील काळजी घेणे आवश्यक आहे . जसे की,
advertisement
पाणी व्यवस्थापन
शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. निचऱ्याची सोय करून अतिरिक्त पाणी बाहेर काढा. सोयाबीन, कापूस, भात, मका यांसारख्या पिकांमध्ये पाणी तुंबल्यास मूळ कुजण्याची शक्यता वाढते.
फवारण्या काय कराल?
सोयाबीन व तूर पिकांवर पाने गळणे, करपा किंवा इतर बुरशीजन्य रोग दिसल्यास कार्बेन्डाझीम (Carbendazim 50% WP – 20 ग्रॅम/10 लिटर पाणी) किंवा
advertisement
मॅन्कोझेब (Mancozeb 75% WP – 25 ग्रॅम/10 लिटर पाणी) फवारणी करावी.
भात पिकात ब्लास्ट रोग दिसल्यास ट्रायसायक्लाझोल (Tricyclazole 75% WP – 6 ग्रॅम/10 लिटर पाणी) फवारणी करावी. कापूस पिकात बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्यास इमामेक्टिन बेन्झोएट (Emamectin Benzoate 5% SG – 4 ग्रॅम/10 लिटर पाणी) फवारावे.
जमीन व खत व्यवस्थापन
माती ओली असल्यामुळे नायट्रोजनचे प्रमाण धुऊन जाते. त्यामुळे युरियाचा मर्यादित व फवारणी पद्धतीने वापर करावा. पिकांना सूक्ष्मअन्नद्रव्यांचा (Micronutrients) फवारणीमार्फत पुरवठा करावा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 23, 2025 7:50 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
कृषी हवामान : आजही शेतकऱ्यांवर पावसाचं संकट! या जिल्ह्यांना अलर्ट, पिकांची काय काळजी घ्याल?