16 लोकांचे एकत्र कुटुंब, फळबाग शेतीतून मिळाली भरारी, प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणा देणारी कहाणी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात चितलवाडी हे गाव आहे. या गावातील इंगळे कुटुंब हे गेल्या 20 वर्षापासून फळबाग केंद्रित शेती करतात. ऐकांदरीत 80 एकर शेतीमध्ये त्यांनी फळबाग लावली आहे. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अकोला : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात चितलवाडी हे गाव आहे. या गावातील इंगळे कुटुंब हे गेल्या 20 वर्षापासून फळबाग केंद्रित शेती करतात. त्यांच्याकडे 45 एकर शेती आहे. त्याचबरोबर 35 एकर शेती त्यांनी भाडे तत्त्वावर घेतली आहे. या संपूर्ण शेतीमध्ये त्यांनी फळबाग लावलेली आहे. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न सुद्धा मिळत आहे. शेती परवडत नाही असे म्हणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी इंगळे कुटुंब हे प्रेरणा देणारे आहे.
advertisement
अकोला येथील प्रगतशील शेतकरी अनंता उर्फ अनिल इंगळे यांच्याशी लोकल 18 च्या प्रतिनिधीने संवाद साधला. तेव्हा ते सांगतात की, चितलवाडी येथे आम्ही 16 लोकांचे कुटुंब एकत्र राहतो. आम्ही चार भावंडं आहोत. रामेश्वर, जगन्नाथ, ज्ञानदेव आणि मी सर्वात लहान अनंता. आम्ही सर्वजण मिळून 80 एकराच्या जवळपास शेती सांभाळतो. त्यातील 30 एकर ही आमची वडिलोपार्जित शेती आहे. त्यात 15 एकर शेती आम्ही स्वतः घेतली आहे. 35 एकर शेती आम्ही भाडेतत्वावर घेतो, असे त्यांनी सांगितले.
advertisement
पारंपरिक शेतीतून फळबाग
पुढे अनंत सांगतात, आधी आम्ही शेतात पारंपरिक पिकं घेत होतो. पण, त्यात उत्पन्न जेमतेम होत असल्याने आम्ही फळबाग शेतीकडे वळलो. फळबाग मध्ये सर्वात आधी केळीची लागवड केली होती. त्यातून चांगले उत्पन्न मिळाले. कालांतराने पाण्याचा सोर्स कमी झाला आणि त्यातच केळीला भाव सुद्धा कमी मिळत होता. तेव्हा मग कमीत कमी वेळात आणि खर्चात जास्त उत्पन्न देणारे पिकं घ्यायचे म्हणून कलिंगडची शेती करायला सुरुवात केली. त्यातूनही चांगले उत्पन्न मिळत होते. मात्र भाव मिळत नव्हता, म्हणून नंतर पपई आणि खरबूज शेती करायला सुरवात केली. सध्या 25 एकरमध्ये पपईची लागवड केली आहे. तर 22 एकर मध्ये खरबूज लागवड करण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर 13 एकर केळी आणि 20 एकर संत्रा आहे.
advertisement
फळबागेत भरभराट मिळण्याचे नेमके कारण काय?
1. नियोजित व्यवस्थापन
2. बाजाराच्या मागणीनुसार पिकांची लागवड आणि वाणांची निवड
3. नवनवीन प्रयोग करण्याची आणि शिकण्याची जिद्द
4. ठिंबक सिंचनाचा वापर
5. संत्रा, केळी, खरबूज, पपई सर्व पिकांचे व्यवस्थित नियोजन
6. क्रॉप कव्हरचा योग्य वापर
क्रॉप कव्हरचा वापर
पपई आणि खरबूज या दोन्ही पिकांवर लहान असताना रोग जाण्याची भीती असते. त्यामुळे एक महिन्यापर्यंत हे दोन्ही पिकं क्रॉप कव्हरमध्ये ठेवावे लागतात. खरबूजमध्ये लागवड झाल्यानंतर 12 दिवसांनी क्रॉप कव्हर दिले जाते. क्रॉप कव्हर वापरल्याने फळांची गुणवत्ता वाढते. रोपांना उन्हाची झळ बसत नाही. रोप ताजे राहते आणि फळांची गुणवत्ता सुधारते. किड लागत नाही, त्यामुळे कोणतेही नाशक वापरण्याची गरज पडत नाही.
advertisement
एकरी उत्पन्न किती होते?
पपईचे एकरी उत्पन्न हे 30 टनांपर्यंत होते. पपईला 10 ते 15 रुपये असा दर मिळतो. पपईची खरेदी जाग्यावरूनच होते. देशभरातील व्यापारी पपईची खरेदी करतात. तर खरबूज हे 10 ते 12 टनांपर्यंत उत्पन्न मिळवून देते. खरबूजला 15 ते 20 रुपये असा दर मिळतो. खरबूज सुद्धा राज्यभरातील व्यापारी खरेदी करतात. यामुळे फळबाग शेती परवडण्यासारखी आहे, असे अनंत यांनी सांगितले.
Location :
Akola,Maharashtra
First Published :
January 16, 2025 7:10 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
16 लोकांचे एकत्र कुटुंब, फळबाग शेतीतून मिळाली भरारी, प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणा देणारी कहाणी