हापूस प्रेमींचा हिरमोड होणार, यंदा आंबा उन्हाळ्यात नाही, इतके महिने लांबणार,कारण काय?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : कोकणचा जगप्रसिद्ध हापूस आंबा यंदा हवामान बदलाच्या संकटात सापडला आहे. ऋतु चक्रानुसार राज्यात ऑक्टोबरनंतर थंडी पडायला हवी होती, मात्र यंदा पावसाचा काळ लांबला आणि उशिरा थंडीची सुरुवात झाली.
मुंबई : कोकणचा जगप्रसिद्ध हापूस आंबा यंदा हवामान बदलाच्या संकटात सापडला आहे. त्यामुळे यंदा आंबा प्रेमींना २ महिने उशिरा वाट पाहावी लागणार आहे. ऋतु चक्रानुसार राज्यात ऑक्टोबरनंतर थंडी पडायला हवी होती, मात्र यंदा पावसाचा काळ लांबला आणि उशिरा थंडीची सुरुवात झाली. त्यामुळे कलमांवर अपेक्षित मोहोर दिसून न आल्याने आंबा हंगाम एक ते दोन महिने उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. परिणामी, यंदा हापूसचा हंगाम थेट पावसाळ्याच्या सुमारास म्हणजेच जून महिन्यापर्यंत लांबणार असल्याची माहिती आहे.
दिवाळीत पहिल्या पेट्या मुंबईत
दरवर्षी दिवाळीच्या काळात देवगड, रत्नागिरी आणि आंबेंगाव परिसरातून काही प्रतीकात्मक पेट्या मुंबई बाजारात दाखल होतात. यावर्षी देखील देवगड भागातून काही मोजक्या पेट्या मुंबईत पोहोचल्या आहेत, मात्र व्यापाऱ्यांच्या मते हा केवळ प्रारंभिक सिग्नल आहे. हवामान स्थिर झाल्याशिवाय मोठ्या प्रमाणात उत्पादन अपेक्षित नाही.
उत्पादनात घट होणार
राज्यात सुमारे ४.८५ लाख हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीखाली असून, यापैकी तब्बल १.२५ लाख हेक्टर क्षेत्र कोकणात आहे. मागील काही वर्षांपासून हवामानातील बदल जसे की अनियमित पाऊस, ढगाळ वातावरण, तापमानातील चढ-उतार याचा आंबा फुलोरा आणि फळधारणा या दोन्ही टप्प्यांवर गंभीर परिणाम होत आहे. परिणामी, आंब्याचे उत्पादन घटते आहे आणि निर्यातही मर्यादित होत आहे.
advertisement
आंबा बागायतदारांची चिंता वाढली
गेल्यावर्षी फेब्रुवारीतच स्थानिक बाजारात आंबा येऊ लागला होता. मार्च २०२४ पर्यंत मुंबई आणि पुणे बाजारात ४० ते ५० हजार पेट्या दाखल झाल्या होत्या. त्या वेळी प्रति पेटी दर ३ ते ४ हजार रुपये इतका मिळाला होता. मात्र, यंदा थंडी उशिरा पडल्याने फुलोरा उशिरा येत आहे. त्यामुळे बागायतदारांना खर्च वाढण्याची व उत्पादन कमी होण्याची भीती आहे.
advertisement
सरकारकडून विमा संरक्षण
हवामान बदलामुळे शेतीत येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कृषी विभागाने काही उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्हा कृषी अधीक्षक शिवकुमार सदाफुले म्हणाले, “हवामान बदलामुळे नुकसान होत असले तरी शेतकऱ्यांसाठी विमा योजना लागू करण्यात आल्या आहेत. उत्पादन टिकवण्यासाठी खतं व औषध फवारणीचं नियोजन वेळेत करणं आवश्यक आहे. योग्य वेळी व्यवस्थापन झाल्यास यंदा उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.”
advertisement
पुढचा काळ आव्हानात्मक
हापूस आंब्याचे फळ बाजारात उशिरा येणार असल्याने व्यापार्यांसाठीही नियोजन कठीण होणार आहे. निर्यातदारांना शिपमेंटच्या तारखा बदलाव्या लागू शकतात. कोकणातील तापमानात स्थैर्य आल्यानंतरच आंब्याचा मोहोर आणि त्यानंतरची फळधारणा निश्चित होईल.
एकूणच, कोकणातील आंबा हंगाम यंदा हवामानाच्या बदलामुळे आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. परंतु बागायतदारांनी पुढील दोन महिने फुलोरा आणि झाडांच्या निगेची काळजीपूर्वक काळजी घेतल्यास नुकसान कमी करण्यास मदत होऊ शकते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 13, 2025 9:00 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
हापूस प्रेमींचा हिरमोड होणार, यंदा आंबा उन्हाळ्यात नाही, इतके महिने लांबणार,कारण काय?


