अतिवृष्टीमुळे सोयाबीन भुईसपाट, ऑक्टोबरमध्ये दर कडाडणार का? मार्केटमधून मोठी अपडेट आली समोर
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : महाराष्ट्रासह देशभरात सोयाबीन पिकावर यंदा दुहेरी संकट कोसळले आहे. एका बाजूला अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तर दुसऱ्या बाजूला बाजारभावात दिलासा मिळालेला नाही.
मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात सोयाबीन पिकावर यंदा दुहेरी संकट कोसळले आहे. एका बाजूला अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तर दुसऱ्या बाजूला बाजारभावात दिलासा मिळालेला नाही. ऑक्टोबर महिना सुरू झाला असून शेतकऱ्यांच्या मनात आता प्रश्न निर्माण झाला आहे की, या महिन्यात सोयाबीनला नेमके काय दर मिळतील?
किमान आधारभूत किंमत आणि प्रत्यक्ष भाव
सन २०२५-२६ हंगामासाठी केंद्र सरकारने सोयाबीनची किमान आधारभूत किंमत (MSP) ५३२८ रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे. मात्र बाजारात शेतकऱ्यांना मिळणारे प्रत्यक्ष भाव यापेक्षा कमी आहेत. मागील काही वर्षांचा विचार केला तर ऑक्टोबर २०२२ मध्ये सरासरी भाव ५०७१ रुपये, ऑक्टोबर २०२३ मध्ये ४६६० रुपये आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये फक्त ४३६९ रुपये प्रति क्विंटल एवढे दर शेतकऱ्यांना मिळाले होते.
advertisement
ऑक्टोबर २०२५ ची स्थिती
सध्या सुरु असलेल्या ऑक्टोबर २०२५ मध्ये सोयाबीनचे भाव ४५१५ रुपये ते ४८९५ रुपये प्रति क्विंटल या दरम्यान राहतील, असा अंदाज बाजार समित्यांनी व्यक्त केला आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना अजूनही एमएसपीपर्यंत पोहोचणारा दर मिळण्याची शक्यता कमीच आहे.
उत्पादनात घट
भारतातील सोयाबीन उत्पादनावर हवामानाचा मोठा परिणाम झाला आहे. सन २०२५-२६ मध्ये सोयाबीनचे उत्पादन सुमारे ११६ लाख टन होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास ८ टक्क्यांनी कमी आहे. सप्टेंबर महिन्यात बाजारात झालेली सोयाबीनची आवकही कमी दिसून आली आहे, ज्याचा परिणाम दरांवर होण्याची शक्यता आहे.
advertisement
निर्यातीतील घसरण
सोयाबीनपासून तयार होणाऱ्या सोयामीलच्या निर्यातीतही घट नोंदवली गेली आहे. सन २०२३-२४ मध्ये भारतातून १९.७ लाख टन सोयामील निर्यात झाली होती, तर सन २०२४-२५ मध्ये ही आकडेवारी घसरून १८ लाख टनांवर आली आहे. जागतिक बाजारातील स्पर्धा आणि दरातील अस्थिरता यामुळे निर्यात कमी झाल्याचे तज्ज्ञ सांगतात.
शेतकऱ्यांचे आव्हान
सध्या शेतकरी अतिवृष्टीमुळे आधीच संकटात आहेत. त्यातच बाजारभावाने समाधानकारक दर मिळत नसल्यामुळे त्यांची अडचण वाढली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून मदत मिळण्याच्या अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
advertisement
सोयाबीन हा महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटक या राज्यांसाठी महत्त्वाचा नगदी पिकांपैकी एक आहे. परंतु सततच्या पावसामुळे उत्पादन घटले, निर्यात कमी झाली आणि बाजारभाव एमएसपीच्या खालीच राहिले. त्यामुळे या ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांना फारसा दिलासा मिळण्याची शक्यता नाही, हे स्पष्ट दिसत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 02, 2025 10:33 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
अतिवृष्टीमुळे सोयाबीन भुईसपाट, ऑक्टोबरमध्ये दर कडाडणार का? मार्केटमधून मोठी अपडेट आली समोर