'कुर्ला टू वेंगुर्ला'चा विषय काय?
सध्या राज्यभरातील ग्रामीण भागात मुलांची लग्न जमणे ही समस्या झाली आहे. गावातल्या मुलींना शहराचे आकर्षण असते. त्यांच्याही आयुष्याबद्दल काही इच्छा-आकांक्षा असतात. परिणामी शहर आणि ग्रामीण भाग अशी एक दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांच्या रखडणाऱ्या लग्नाचा संवेदनशील विषय, त्याच्याशी जोडलेले सामाजिक मुद्दे, परस्पर नातेसंबंध अशा विषयाची मांडणी कुर्ला टू वेंगुर्ला या सिनेमात करण्यात आली आहे. गंभीर विषयाची अत्यंत मनोरंजक पद्धतीने हाताळणी या सिनेमात करण्यात आली आहे. ट्रेलरने सिनेमाविषयी उत्सुकता वाढवली आहे.
advertisement
सिने कथा कीर्तन, चंद्रभागा स्टुडिओज आणि एम व्ही शरतचंद्र यांनी 'कुर्ला टू वेंगुर्ला' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अमरजीत आमले, विजय कलमकर, चारुदत्त सोमण, नयना सोनावणे, अविनाश सोनावणे, एम. व्ही. शरतचंद्र हे या सिनेमाचे निर्माते आहेत. सिनेमाची कथा, पटकथा आणि संवाद लेखन अमरजीत आमले यांनी लिहिली आहे. तर दिग्दर्शन विजय कलमकर यांचं आहे.
'कुर्ला टू वेंगुर्ला'ची स्टारकास्ट
या सिनेमात अभिनेत्री वीणा जामकर, प्रल्हाद कुडतरकर, वैभव मांगले, सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर, साईंकित कामत अशी दमदार स्टारकास्ट महत्त्वाच्या भुमिकेत आहेत. यासोबतच अमेय परब, शेखर बेटकर आणि अनघा राणे या नवोदित कलाकारांचा अभिनयही आपल्याला पाहायला मिळणार आहे. रंगनाथ बाबू गोगीनेनी यांनी छायांकन, विजय कलमकर यांनी संकलन, अविनाश सोनावणे यांनी ध्वनिआरेखन, चंचल काळे, अमरजित आमले यांनी गीतलेखन, अक्षय खोत यांनी संगीत दिग्दर्शन, पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे, तर वितरक म्हणून पिकल एंटरटेनमेंट काम पाहणार आहे.कुर्ला टू वेंगुर्ला हा सिनेमा 19 सप्टेंबरला महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.