जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मते, दिव्यांग मुलांमध्ये उपजत क्षमता असून त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण दिल्यास ते समाजासाठी सकारात्मक आणि मोठा बदल घडवू शकतात. रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे प्रशिक्षण केवळ कौशल्य विकास नसून दिव्यांगांना स्वावलंबी जीवनाची गुरुकिल्ली आहे.
आयटीमधील नोकरी सोडली, वाचनसंस्कृतीसाठी पुण्यातील दाम्पत्याचा अनोखा उपक्रम, Video पाहून कराल कौतुक
advertisement
आत्मनिर्भर होण्यासाठी पहिले पाऊल
दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केवळ शासकीय पातळीवरच नव्हे, तर समाजानेही विशेष आणि एकत्रित प्रयत्न करण्याची नितांत गरज असल्याचे जिल्हाधिकारी सांगतात. सर्वांनी एकत्र येऊन या मुलांमधील कौशल्ये विकसित करण्यासाठी काम करावे. दिव्यांग मुलांची ताकद काय आहे, शक्तिस्थळे काय आहेत हे लक्षात घेऊन त्यांच्या शक्तिस्थळांचा विकास करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करून, त्यांना महिन्याला किमान 40 ते 50 हजार एवढे उत्पन्न आयुष्यभर मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते.
पहिल्या टप्प्यातील ट्रेनिंगनंतर सर्जनशीलतेचे हुंकार
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून राज्यात प्रथमच मूकबधिर मुलांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स प्रशिक्षण उपक्रम वर्शिप अर्थ फाउंडेशनच्या मदतीने पंधरा दिवस दिनेश कदम यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने राबवला होता. पाचवी ते आठवीच्या मूकबधिर विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या प्रशिक्षणाच्या जोरावर थ्री-डी प्रिंटरमधून गणपती बाप्पाची मूर्ती साकारली. दिव्यांग मुलांच्या सुप्त सर्जनशीलतेला मिळालेला पहिला हुंकार पहिल्या टप्प्यातील ट्रेनिंगनंतर पाहायला मिळाला.
मुलांनी सेन्सरच्या मदतीने आग लागल्यास किंवा वीज गेल्यास वाजणारा अलार्म बनवला आहे. चॅट-जीपीटीमध्ये स्वतः टाइप करून आपल्या मनातल्या कल्पनांना चित्रांचे रूप द्यायला शिकले आहेत. आता त्यांच्या भावनांना व्यक्त होण्यासाठी शब्दांची गरज उरली नाही. निसर्गाने न दिलेला आवाज अन् भाषा त्यांना तंत्रज्ञानाने दिली आहे.





