छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. सध्या मराठवाड्यात दुष्काळ पडलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांवरती मोठं संकट आलेले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना देण्यासाठी पाणी नाहीये. अनेक शेतकरी तर पिकांना विकत घेऊन पाणी देत आहेत. ज्यांच्याकडे फळबागा आहेत अशा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी रामकिशन लोखंडे यांनी त्यांची डाळिंबाची बाग पाण्याअभावी जेसीबीने उपटून टाकली आहे.
advertisement
800 झाडांवर फिरवला जेसीबी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आडगाव बुद्रुक येथील शेतकरी रामकिशन लोखंडे यांनी त्यांची दोन एकरवरील तब्बल 800 झाडे असलेली डाळिंबाची बाग ही जेसीबीने उपटून टाकलेली आहे. रामकिसन लोखंडे सांगतात की, आम्ही आमची बाग वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. आम्ही या डाळिंबाच्या बागेला टँकरने विकत घेऊन पाणी देखील दिले . पण सध्याला टँकरचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. गेल्या तीन महिन्यापासून आम्ही टॅंकर विकत घेऊन या झाडांना पाणी देत होतो. आता टँकर घेऊन पाणी देणे हे देखील आमच्याकडून शक्य नाहीये. एक टँकर विकत घ्यायचा म्हटलं तर अडीच हजार रुपये एवढा खर्च येतो. आता हा खर्च करणे शक्य नाही. त्यामुळे ही बाग आम्ही उपटून टाकली आहे.
अतिवृष्टी होणाऱ्या तालुक्यात भीषण पाणीटंचाई, जलसंधारणासाठी सरसावले जावळीकर, PHOTOS
आम्हाला या झाडांचा वर्षाकाठी 4 ते 5 लाख एवढा खर्च यायचा. जेसीबीने झाडे लावण्यासाठी खड्डे केले होते. यासाठी आम्ही ठिबक देखील लावलं होतं. हे रोप विकत घेण्यासाठी 10 ते 15 हजार रुपये एवढा खर्च आला होता. लागवडीसाठी एकूण खर्च 50 हजारच्या आसपास खर्च हा आला होता. अगदी स्वतःच्या लेकराप्रमाणे या झाडांना सांभाळ केला. शेतीतून उत्पन्न भेटत नव्हतं यामुळे आम्ही ही फळबाग लावली होती आणि यातून आमचं उत्पन्न निघायचं. पण आता पाण्याअभावी फळ आलेली सर्व झाडे उपटून टाकलेले आहेत. आता घरचा खर्च कसा करावा हा आमच्या पुढे सर्वात मोठा प्रश्न आहे, असं रामकिशन लोखंडे यांनी सांगितले आहे.