पनवेलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, 'जेएनपीटी', नैना क्षेत्रातील विविध विकासप्रकल्पांमुळे रायगड जिल्ह्यात 'तिसरी मुंबई' उभी राहत आहे. आता त्या पाठोपाठ पालघर जिल्ह्यात 'चौथी मुंबई' आकाराला येणार आहे. पालघर जिल्ह्यात जगातील दहाव्या क्रमांकाचे सर्वात मोठे वाढवण बंदर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे नवे विमानतळ, मुंबईतून थेट पालघरला जोडणारा सागरी मार्ग, बुलेट ट्रेन असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित आहेत. ही नव्याने वसणारी चौथी मुंबई हे मुंबई, नवी मुंबई आणि तिसऱ्या मुंबईपेक्षा सुपर कनेक्टिव्हीटी असणारे शहर ठरणार आहे.
advertisement
कोकणातील भराडी देवी यात्रेसाठी रेल्वेचं गिफ्ट, घेतला मोठा निर्णय, भाविकांना होणार फायदा
चौथ्या मुंबईसाठी 107 गावांतील 512 चौ. किमी क्षेत्रासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने राज्य सरकारकडे सादर केला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळताच एमएसआरडीसीचा नवे शहर उभारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. नीती आयोगाने मुंबई महानगरला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेशात आर्थिक विकास केंद्र (ग्रोथ हब) उभारली जाणार आहेत.
11 गावांतील विकास केंद्राला मंजुरी
देशातील सर्वात मोठे बंदर ‘वाढवण’ येथे उभारले जात असून तिथंच चौथी मुंबई वसविण्याचे सरकारचे नियोजन आहे. यामध्ये वाढवण जवळील वंधवन, आंबीस्तेवाडी, वसगाव, वरोर, ताडियाले, धुमकेत, गुंगावडा, पोखरण, बहाडा-पोखरण, चांदेगाव आणि धाकटी डहाणू अशा 11 गावांमधील 33.88 चौ. किमी क्षेत्रावर विकास केंद्राचे नियोजन आहे. त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली होती. नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्तावाच्या आता मंजुरीची प्रतीक्षा आहे.
AC मधील फुकट्यांना दणका, पश्चिम रेल्वेने वसूल केले 1175400000!
असा असणार आराखडा
एमएसआरडीसीने 33.88 चौ. किमी जागेसाठी विकास योजना तयार करण्याच्या कामास सुरुवात केली आहे. जमीन वापर नकाशा, अधिसूचित क्षेत्राचे सर्वेक्षण आणि अन्य अभ्यास या कामांना सुरुवात झाली आहे. ही कामे झाल्यानंतर त्यावर नागरिकांच्या सूचना-हरकती मागविल्या जातील. आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर असल्यामुळे रस्ते-वाहतुकीचे नियोजन, कंटेनर डेपो, लॉजिस्टीक पार्क, अनुषंगिक उद्याोग आदीचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे.
चौथ्या मुंबईची वैशिष्ट्ये काय?
वाढवण हे जागातील पहिल्या 10 मोठ्या बंदरांपैकी एक असेल. बंदरामुळे भविष्यात वाढवण आणि पालघरचा विकास झपाट्याने होणार आहे. ही बाब लक्षात घेता येथे अनेक सुविधा विकसित करणे आवश्यक आहे. त्यातून सरकारने वाढवण विकास केंद्राचा निर्णय घेतला गेला आहे. चौथ्या मुंबईच्या निर्माणात वाढवण बंदर हा प्रकल्प जितका महत्त्वाचा, तितकाच वर्सोवा-विरार-पालघर सी-लिंक हा प्रकल्पही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पामुळे नरिमन पॉईंट ते पालघर हा प्रवास केवळ एक तासांत करणे शक्य होईल.
वाढवण बंदरामार्गे आलेल्या माल साठवण्यासाठी लॉजिस्टीक पार्क, बंदरामुळे उद्योग विश्वातील अनेकांची या भागात ये-जा वाढेल. त्या पार्श्वभूमीवर पंचतारांकित हॉटेल उभारण्याचे प्रस्तावित आहे. मनोरंजनाच्या अनुषंगाने रिक्रिएशन ग्राउंड असतील. यामध्ये गोल्फ कोर्सचा समावेश असेल. कन्व्हेंशन सेंटर्स उभारली जातील. वाढवण बंदर ते दिल्ली मुंबई डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर दरम्यान मालाची जलद आणि पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी रेल्वेचा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर असेल. नव्या शहरात हेलिपॅड, एअरस्ट्रीप उभारण्याचेही नियोजित आहे.
कशी असेल हद्द ?
वाढवण बंदराच्या प्रभाव क्षेत्रातील तब्बल 107 गावांमध्ये आणि 512 चौ. किमीच्या प्रदेशात चौथी मुंबई विकसित करण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव जानेवारीमध्येच एसआरआरडीसीने राज्य सरकारकडे पाठविला आहे. या प्रस्तावानुसार चौथ्या मुंबईची हद्द ही वाढवण बंदराच्या क्षेत्रापासून ते तलासरीपर्यंत विस्तारलेली असेल. प्रस्तावित क्षेत्रासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून एमएसआरडीसीच्या नियुक्तीला राज्य सरकारची मान्यता मिळण्याची प्रतीक्षा आहे. अशी मान्यता मिळताच एका वर्षाच्या आत या भागाचा विकास आराखडा तयार करण्याचे नियोजन एमएसआरडीसीने आखले आहे.