राजकीय कारणांमुळे या शाळेत बदली झालेल्या वारे गुरुजींनी परिस्थितीला शरण न जाता, शिक्षणाच्या माध्यमातून बदल घडवण्याचा निश्चय केला. त्यांनी केवळ शाळेचा चेहरामोहराच बदलला नाही, तर शिक्षण पद्धतीही नाविन्यपूर्ण केली. विषय मित्र प्रणाली ही संकल्पना यशस्वीपणे राबवत, त्यांनी शिक्षणात सहशिक्षण, सहकार्य, आणि जबाबदारी यांचा सुंदर संगम घडवून आणला. या पद्धतीनुसार मोठे विद्यार्थी छोटे विद्यार्थ्यांचे ‘विषय नेते’ बनतात आणि त्यांना शिकवतात, समजावतात. यामुळे एकमेकांकडून शिकण्याची सवय लागते आणि अभ्यासात रस निर्माण होतो.
advertisement
शाळेत आज तंत्रज्ञानाने समृद्ध अशा स्मार्ट बोर्ड्स, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, ई-लायब्ररी, तसेच रोबोटिक्स व कोडिंगसारख्या आधुनिक विषयांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ही भारतातील एकमेव सरकारी शाळा आहे जिथे इंग्रजीसोबत जपानी भाषा शिकवली जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी डिजिटल शिक्षणासोबतच कृषी, हस्तकला, विज्ञान प्रयोग, योगा आणि क्रीडाविषयक उपक्रमही राबवले जातात.
शाळेच्या पुनर्बांधणीपासून ते शिक्षकांच्या कमीतरतेमुळे तज्ज्ञ पालक व ग्रामस्थांकडून शिकवले जाणारे इलेक्ट्रॉनिक्स, सुतारकाम, प्लंबिंग, भाषा शिक्षण ही सर्व कौशल्ये शाळेच्या उभारणीत मोलाची भर घातली आहे. या अनोख्या प्रयोगामुळे शाळेने "सरकारी शाळांना भविष्यात जागा नाही" या चुकीच्या समजुतीला खोडून काढलं आहे. शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ झाली असून अनेक राज्य सरकारांनी या शैक्षणिक मॉडेलचा स्वीकार केला आहे.
आज ही शाळा केवळ शिक्षण देत नाही, तर समाज परिवर्तनाचं एक जिवंत उदाहरण बनली आहे. जिथे विद्यार्थ्यांपासून शिक्षक, पालक, गावकरी सगळे मिळून ज्ञानाचा खरा उत्सव साजरा करत आहेत. वारे गुरुजींनी दाखवून दिलं की योग्य दृष्टिकोन, नवाचार आणि सामूहिक प्रयत्नांच्या जोरावर, कोणतीही शाळा जागतिक स्तरावर यशस्वी होऊ शकते. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर भविष्य घडवण्याची ताकद आणि जालिंदरनगर शाळा हेच आज दाखवून देत आहे.