राज्यात मंत्रिमंडळविस्तार, खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदावरुन महायुतीत रस्सीखेच सुरु असल्याचं दिसतंय. कोकणात नऊ मंत्री मिळाल्यानंतर पालकमंत्री कुणाला मिळणार याबाबत चर्चा सुरु झाल्यात. कोकणातील 7 जिल्ह्यांचा पालकमंत्रीपदांचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून या फॉर्म्युल्यामध्ये तीन पालकमंत्रिपदं शिवसेनेकडे, तर चार पालकमंत्रिपदं भाजपला मिळण्याची शक्यता आहे. अशी माहिती सूत्रांनी दिलीये. भरत गोगावले पालकमंत्री होणार हे जवळपास निश्चित आहे. तर नितेश राणे सिंधुदुर्गचे पालकमंत्री होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. अदित तटकरे पुन्हा मंत्री झाल्यात. त्यांना महिला आणि बालकल्याण खातं मिळालं, कारण लाडकी बहिण योजनेमुळे राज्यात महायुतीचा मोठा विजय झाल्याने तटकरेंना पुन्हा तेच खातं देण्यात आलंय. त्यामुळे सध्याच्या काळात महत्वाचं खातं तटकरेंना दिल्याने रायगडचं पालकमंत्रीपद भरत गोगावलेंकडे जाणार हे निश्चित मानलं जातंय. तर रत्नागिरीत उदय सामंत हे पालकमंत्री होण्याची शक्यता आहे. तर 2019मध्ये सिंधुदुर्गाचे पालकमंत्रीपद रविंद्र चव्हाणांकडे होते. मात्र ते सध्या मंत्रिमंडळात नसल्याने नितेश राणेंकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी येऊ शकते. तर मुंबई भाजपकडे आणि ठाणे शिवसेनेकडे असू शकते. त्यानुसार एकनाथ शिंदेंकडे ठाण्याचे पालकमंत्री पद, भाजपच्या आशिष शेलारांकडे मुंबईचे पालकमंत्रीपद येऊ शकतं. अशी माहिती सूत्रांनी दिलीये.