Shravan 2025: श्रावण पाळायचा म्हणजे फक्त मांसाहार सोडणं नव्हे; या गोष्टीही त्यासोबत टाळायला हव्या
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shravan 2025: खरंतर श्रावण पाळणं म्हणजे फक्त मांसाहार वर्ज्य करणं असा त्याचा अर्थ होत नाही. या काळात काही गोष्टी वर्ज्य केल्या जातात. यामागे धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणेही आहेत. श्रावण महिन्यात निसर्गात अनेक बदल होतात, त्यामुळे...
मुंबई : श्रावण महिना हा भगवान शंकराच्या विशेष पूजेचा काळ, श्रावणात सर्वत्र शिवमय वातावरण पाहायला मिळतं. अनेकजण सहज विचारतात श्रावण पाळलाय का? खरंतर श्रावण पाळणं म्हणजे फक्त मांसाहार वर्ज्य करणं असा त्याचा अर्थ होत नाही. या काळात काही गोष्टी वर्ज्य केल्या जातात. यामागे धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणेही आहेत. श्रावण महिन्यात निसर्गात अनेक बदल होतात, त्यामुळे आरोग्य आणि मन शुद्ध ठेवण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक आहे. म्हणजे श्रावण पाळणं असं त्याला म्हणतात.
श्रावणात वर्ज्य असलेल्या गोष्टी -
मांसाहार - श्रावण महिना हा व्रत, तपस्या आणि साधनेचा काळ आहे. या काळात सात्विक आहार घेणे महत्त्वाचे मानले जाते, ज्यामुळे मन आणि शरीर शुद्ध राहते. मांसाहार हा तामसिक मानला जातो. पावसाळ्यात पचनशक्ती कमकुवत होते. मांसाहार पचायला जड असतो. तसेच, या काळात वातावरणातील ओलावा आणि कमी सूर्यप्रकाशामुळे जीवाणू आणि विषाणूंचा प्रसार वाढतो, ज्यामुळे मांसाहार केल्यानं आजारी पडण्याची शक्यता असते.
advertisement
मद्यपान आणि धूम्रपान - हे दोन्ही पदार्थ तामसिक आहेत आणि ते शरीरासोबतच मनालाही अशुद्ध करतात. श्रावणात देवाची उपासना करायची असल्याने हे पदार्थ टाळले जातात. पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती कमी होते. मद्यपान आणि धूम्रपान केल्यानं शरीर आणखी कमकुवत होते आणि अनेक आजारांना निमंत्रण मिळते.
कांदा आणि लसूण - कांदा आणि लसूण तामसिक मानले जातात. असे मानले जाते की हे पदार्थ खाल्ल्याने मन आणि विचार अशुद्ध होतात, ज्यामुळे पूजा-पाठ आणि साधनेत मन एकाग्र होत नाही. पावसाळ्यात पचनशक्ती कमकुवत असल्यामुळे कांदा आणि लसूण पचायला जड जातात. तसेच, आयुर्वेदामध्ये त्यांना उत्तेजक मानले आहे.
advertisement
श्रावण महिन्यात सोमवारी दूध, दही, तूप, पनीर यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे शुभ मानले जात नाही. या गोष्टी भगवान शंकराला अर्पण केल्या जातात. त्यामुळे दानधर्म करायचा झाल्यास दुधाऐवजी इतर वस्तू दान करणे अधिक योग्य मानले जाते. श्रावण महिन्यात दुपारी किंवा दिवसा झोपणे टाळावे. हे धार्मिकदृष्ट्या अशुभ मानले जाते. श्रावण महिन्यात पुरुष केस कापणं टाळतात. ते धार्मिक विधींशी संबंधित आहे.
advertisement
श्रावणात पाळले जाणारे नियम फक्त धार्मिक नसून ते आरोग्य आणि स्वच्छतेशीही संबंधित आहेत. पावसाळ्यात पचनक्रिया मंदावते, त्यामुळे हलका आणि सात्विक आहार घेणे महत्त्वाचे आहे. वातावरणातील बदलांमुळे अनेक संसर्गजन्य रोग पसरतात. त्यामुळे शरीर शुद्ध ठेवणे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शुद्ध आहार आवश्यक आहे. श्रावण महिन्यात या गोष्टी टाळून तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक शुद्ध आणि उत्साही राहू शकता.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jul 16, 2025 4:19 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shravan 2025: श्रावण पाळायचा म्हणजे फक्त मांसाहार सोडणं नव्हे; या गोष्टीही त्यासोबत टाळायला हव्या









