Ajit Pawar : "तो फक्त मित्र नव्हता..." अजित दादांच्या निधनाने वर्गमित्र उदय कळसकरांचा कंठ दाटून आला; आठवणींनी पाणावले डोळे
- Published by:Devika Shinde
Last Updated:
बारामतीच्या मातीतला असाच एक 'मैत्रीचा आधारस्तंभ' निखळला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र हळहळत असतानाच, बारामतीतील त्यांच्या वर्गमित्रांनी सांगितलेल्या आठवणी ऐकून कोणाचेही डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत.
मुंबई : आयुष्यात कितीही मोठी पदं मिळाली, प्रसिद्धी मिळाली किंवा जग जरी तुम्हाला 'साहेब' म्हणून ओळखू लागलं, तरी आपल्या बालपणीच्या मित्रांसाठी आपण तोच लहानपणाचा खोडसाळ, मस्तीखोर सवंगडी असतो. राजकारणाच्या धावपळीत अनेकजण जुनी नाती विसरतात, पण काही व्यक्ती अशा असतात ज्या कितीही मोठ्या झाल्या तरी आपल्या मुळांना आणि बालमित्रांना कधीच विसरत नाहीत.
बारामतीच्या मातीतला असाच एक 'मैत्रीचा आधारस्तंभ' निखळला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र हळहळत असतानाच, बारामतीतील त्यांच्या वर्गमित्रांनी सांगितलेल्या आठवणी ऐकून कोणाचेही डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. अजित पवार म्हणजे राजकारणातला एक कडक शिस्तीचा, स्पष्टवक्ता आणि कामाचा प्रचंड उरक असलेला नेता. पण या कणखर व्यक्तिमत्त्वाच्या मागे एक हळवा मित्र दडलेला होता, हे त्यांच्या वर्गमित्रांच्या बोलण्यातून आज प्रकर्षाने जाणवतंय. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत उदय कळसकस यांनी आपल्या मित्रासोबतची आपली आठवण शेअर केली.
advertisement
गोट्या, पतंग आणि आमराईतला बंगला
अजितदादांचे 1 ली ते 10 वी पर्यंतचे वर्गमित्र उदय शहा कळसकर यांनी दादांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. ते सांगतात की, "आज केवळ एक नेता गेला नाही, तर माझ्या कुटुंबातलं एक माणूस गेल्यासारखं वाटतंय. काळाकुट्ट अंधार दाटलाय."
कळसकर अजित दादांची आठवण सांगत म्हणाले की, "दादा आमराईतील आप्पासाहेबांच्या बंगल्यावर राहायचे आणि मी समोरच्या बोहरी चाळीत. लहानपणी गोट्या खेळणं, विटी-दांडू, पतंग उडवणं असो वा तासनतास क्रिकेट आम्ही एकत्र खेळलो. त्यांना क्रिकेट आणि खो-खोची आवड होती. त्यांची ही अचानक अवेळी झालेली 'एक्झिट' आहे."
advertisement
सत्तेचा 'आव' कधीच आणला नाही
अजितदादा महाराष्ट्राचे मोठे मंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, पण आपल्या मित्रांना भेटताना त्यांनी कधीही त्या पदाचा 'रुबाब' दाखवला नाही. उदय कळसकर म्हणतात, "दादा महाराष्ट्राचे नेते होते, पण आम्हाला भेटताना ते फक्त आमचे वर्गमित्र असायचे. कोणत्याही कार्यक्रमात भेटले की स्वतः जवळ बोलवायचे, खांद्यावर हात टाकून मनमोकळ्या गप्पा मारायचे. घरच्यांची चौकशी करायचे. त्यांच्या या मिश्कील स्वभावाने आमच्या मनात घर केलं होतं."
advertisement
मैत्री जपण्यात दादांचा हात कोणीच धरू शकत नव्हतं. 2012 मध्ये जेव्हा ते पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन पाचगणीला सर्व वर्गमित्रांचे 'गेट-टुगेदर' आयोजित केले होते. त्या कार्यक्रमाला ते सुनेत्रावहिनींसह आले होते. कळसकर यांच्यासाठी तो दिवस अविस्मरणीय ठरला, कारण त्यांच्या लग्नाचा वाढदिवस स्वतः दादांच्या उपस्थितीत तिथे साजरा झाला होता.
advertisement
अजितदादा म्हणजे ग्रामीण महाराष्ट्राची नस ओळखणारे नेतृत्व होते. त्यांच्या कामाची पद्धत जितकी रोखठोक होती, तितकीच त्यांची मैत्रीही निखळ होती. त्यांची ही अवेळी झालेली 'एक्झिट' केवळ राजकारणाचं नुकसान नाही, तर बारामतीच्या त्या जुन्या गल्लीतील मैत्रीची एक मोठी पोकळी आहे, जी कधीही भरून येणार नाही. हे सगळं सांगताना आणि बोलताना उदय यांचा कंठ दाटून आला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 10:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar : "तो फक्त मित्र नव्हता..." अजित दादांच्या निधनाने वर्गमित्र उदय कळसकरांचा कंठ दाटून आला; आठवणींनी पाणावले डोळे









