BMC Election: झटपट निकालाला ब्रेक, बीएमसीची मतमोजणी रखडणार? राज्य निवडणूक आयोगाने वाढवलं उमेदवारांचे टेन्शन
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
BMC Election Vote Counting : झटपट निकाल लागून विजयाचा गुलाल उधळण्यासाठी उत्सुक असणाऱ्या कार्यकर्त्यांना आणखी जास्त वेळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला वेळ लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीचा झटपट निकाल लागून विजयाचा गुलाल उधळण्यासाठी उत्सुक असणाऱ्या कार्यकर्त्यांना आणखी जास्त वेळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला वेळ लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतमोजणी प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचा बदल केला आहे. गेल्या काही निवडणुकांमधील मतमोजणीदरम्यान झालेला गोंधळ टाळण्यासाठी, आता एकाच वेळी सर्व वॉर्डांची मतमोजणी न करता ती 'एकापाठोपाठ एक' या पद्धतीने करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे निकालासाठी उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना ताटकळत उभे राहावे लागणार असून, राजकीय वर्तुळातून यावर तीव्र आक्षेप घेतले जात आहेत.
advertisement
काय आहे नवा नियम?
मुंबईत २२७ वॉर्डांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. पालिकेने यासाठी २३ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जुन्या पद्धतीनुसार, एका निवडणूक अधिकाऱ्याच्या अखत्यारीत येणाऱ्या ५ ते ६ वॉर्डांची मतमोजणी एकाच वेळी सुरू व्हायची. मात्र, नव्या निर्णयानुसार आता प्रथम एका वॉर्डाची मतमोजणी पूर्ण केली जाईल. त्या वॉर्डाचा निकाल जाहीर झाल्यावरच दुसऱ्या वॉर्डाची मोजणी सुरू होईल. जर एखाद्या विभागात २०७ ते २२७ पर्यंत वॉर्ड असतील, तर २०७ क्रमांकाचा निकाल लागल्याशिवाय २०८ क्रमांकाची मोजणी सुरू होणार नाही.
advertisement
राजकीय पक्षांचा विरोध आणि आजची महत्त्वाची बैठक
निवडणूक आयोगाचा हा निर्णय पारदर्शकतेसाठी असल्याचे सांगितले जात असले तरी, राजकीय पक्षांनी याला विरोध दर्शवला आहे. एकाच वेळी मोजणी सुरू केल्यास निकाल लवकर हाती येतात, मात्र या नव्या पद्धतीमुळे शेवटच्या वॉर्डाचा निकाल लागण्यास मध्यरात्र किंवा दुसरा दिवस उजाडू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी आज (सोमवारी) निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे.
advertisement
पारदर्शकतेवर आयोगाचा भर
सूत्रांच्या माहितीनुसार, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये मतमोजणीच्या वेळी अनेक ठिकाणी गोंधळ आणि आरोप-प्रत्यारोप झाले होते. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि संपूर्ण प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे पूर्ण नियंत्रण राहावे, या हेतूने आयोगाने हा कठोर पवित्रा घेतल्याचे समजते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 12, 2026 9:09 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election: झटपट निकालाला ब्रेक, बीएमसीची मतमोजणी रखडणार? राज्य निवडणूक आयोगाने वाढवलं उमेदवारांचे टेन्शन








